Assam Flood | शेकडो गावं, २ लाखांच्या आसपास लोक प्रभावित, आसाममध्ये पूरस्थिती गंभीर

वशिष्ट नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने आसामच्या शेकडो गावात पुराचे पाणी शिरल्याने राज्य भीषण पूरसंकटात अडकले आहे. मिळालेल्या माहितीनुसार उद्भवलेल्या या स्थितीमुळे जवळपास दोन लाख नागरिकांना पुराने प्रभावित केले आहे.
रविवारी आसाममधील पूरस्थिती अधिकच गंभीर झाली. पूर्व आणि उत्तर आसाममधील शेकडो गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. रेल्वे संपर्क विस्कळीत झाला आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला ‘ऑपरेशन जल राहत’ सुरू करावे लागले, तसेच बचाव कार्याला गती देण्यात आली.
अधिकृत माहितीनुसार, आसाममधील १२ जिल्हे आणि ३० महसूल विभागांमधील ५८० गावे पुराच्या तडाख्यात असून, १०,३६२ हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील उभी पिके पाण्याखाली गेली असून, कामरूपच्या अनेक भागांतून शहरातही पुराचा प्रभाव जाणवत असल्याचे वृत्त समोर आले आहे.
या जिल्ह्यांना पूराचा फटका
भीषण पूरस्थितीचा फटका राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसला असून त्यात शिवसागर, चराईदेव आणि जोरहाट जिल्ह्यांचा समावेश आहे. सततच्या पावसामुळे मोठा भाग पाण्याखाली गेला आहे, किमान दोन बंधारे फुटले आहेत आणि अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. काही ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे रेल्वे रुळांचे नुकसान झाले असून, रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे आणि अप्पर आसाममधील संपर्क यंत्रणेवर गंभीर परिणाम झाला आहे.
गुवाहाटीमध्ये मुसळधार पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरले, ज्यामुळे पलंग, सोफे, स्वयंपाकघरातील उपकरणे आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले. पार्किंगच्या जागा आणि अंतर्गत रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे अनेक रहिवाशांना आपली वाहने सुरक्षित ठिकाणी हलवावी लागली.
पुरामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. रविवार रात्रीपासून अनेक कुटुंबांच्या स्वयंपाकघरात पाणी शिरल्याने त्यांना स्वयंपाक करता येत नाही. सकाळपासून लोक बादल्या आणि पंपांच्या साहाय्याने आपल्या घरातून पाणी बाहेर काढण्याचा आणि आपले सामान वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत.
आर्मीचे ऑपरेशन वॉटर रिलीफ
पूरस्थिती प्रचंड बिकट असल्याने, भारतीय लष्कराने आसाम रायफल्सच्या साथीने पुढाकार घेतला आणि बाधित जिल्ह्यांमध्ये शोध व बचाव कार्यासाठी अनेक तुकड्या तैनात केल्या. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलानेही आपली मोहीम तीव्र केली. शिवसागर आणि चराईदेव येथे चोवीस बोटी तैनात करण्यात आल्या, तर अडकलेल्या रहिवाशांच्या सुटकेसाठी प्रत्येकी १० बोटींसह दोन अतिरिक्त पथके सेवेत दाखल करण्यात आली.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, लोकांची सुरक्षा हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून प्रशासन अहोरात्र परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मंत्री अजंता निओग, बिमल बोरा, केशव महंत आणि सुशांत बोरगोहेन यांना पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये तातडीने पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यांच्यावर बचाव आणि मदत कार्यावर देखरेख ठेवण्याची आणि प्रत्येक बाधित कुटुंबापर्यंत वेळेवर मदत पोहोचेल याची खात्री करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासोबतच, संवेदनशील ठिकाणी मदत साहित्यही वेगाने पोहोचवले जात आहे.
ब्रह्मपुत्रा खोऱ्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे असतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. बचाव यंत्रणा सतर्क असून, पुराचे पाणी वाढल्यास तैनात करण्यासाठी अतिरिक्त दल सज्ज ठेवण्यात आले आहे.
स्थानिक रहिवाशांनी आपले दुःख व्यक्त केले.
गुवाहाटीतील एका रहिवाशाने आपला अनुभव सांगताना म्हटले, “प्रत्येक पावसाळ्यात आम्हाला या परिस्थितीचा सामना करावा लागतो. जेव्हा कधी सतत पाऊस पडतो, तेव्हा आमच्या घरात पाणी शिरते. यामुळे लहान मुले, वृद्ध आणि अगदी पाळीव प्राण्यांनाही खूप त्रास होतो.”
आमच्या स्वयंपाकघरात पाणी शिरले आहे, त्यामुळे आज सकाळी आम्हाला स्वयंपाक करता आला नाही. सकाळपासून संपूर्ण कुटुंब घरातून पाणी उपसण्यात व्यस्त आहे. पुराचे बहुतेक पाणी मेघालयाच्या डोंगरांमधून येते आणि जेव्हा वशिष्ठी नदीची पाणी पातळी वाढते, तेव्हा परिस्थिती आणखीनच बिकट होते.
Source link



