बळजबरीने लोकांना पाठवू देणार नाही!

बीएसएफवर भडकले बांगलादेशचे गृहमंत्री : घुसखोरांबद्दल बाळगले मौन
वृत्तसंस्था, ढाका
बांगलादेशने लोकांना अवैधपद्धतीने सीमापार करविण्याचे सर्व प्रयत्न यशस्वीपणे रोखले आहेत आणि कुठल्याही निश्चित कायदेशीर प्रक्रियेशिवाय लोकांना देशात शिरू देणार नसल्याचा दावा बांगलादेशचे गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद यांनी केला आहे. त्यांनी हे वक्तव्य भारताला उद्देशून केले आहे. भारतात बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. भारतीय सुरक्षा दलांकडून बांगलादेशी घुसखोरांना त्यांच्या मायदेशी परत पाठविण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. तर बांगलादेशी बॉर्डर फोर्स या बांगलादेशी नागरिकांना मायदेशी येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत आहे.
कुठल्याही व्यक्तीला अवैध स्वरुपात ढकलून (पुश-इनद्वारे) बागंलादेशात घुसण्याची अनुमती दिली जाणार नाही. बॉर्डर गार्ड बांगलादेशने स्थानिक लोकांच्या मदतीने आतापर्यंत अशाप्रकारचे सर्व प्रयत्न यशस्वीपणे हाणून पाडले आहेत. काही लोक अवैधमार्गाने देशात दाखल झाले होते, परंतु अधिकाऱ्यांनी अशा प्रकरणी कारवाई केली असल्याचे सलाहुद्दीन यांनी बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या मुख्यालयाच्या दौऱ्यानंतर सांगितले आहे.
भारत-बांगलादेश आमने-सामने
भारताने अवैध घुसखोरांची एक यादी बांगलादेशला सोपविली आहे. परंतु बांगलादेश सरकारने अद्याप त्यांची ओळख पटविलेली नाही असे भारतीय विदेश मंत्रालयाने अलिकडेच सांगितले होते. तर बांगलादेशच्या गृहमंत्र्यांनी आता पश्चिम बंगालच्या राजकीय कारवायांना प्रत्युत्तर देण्याऐवजी या प्रकरणी भारत सरकारसोबत चर्चा करणार असल्याचे म्हटले आहे. एखादा बांगलादेशी नागरिक भारतात राहत असल्यास भारतीय अधिकाऱ्यांना निश्चित प्रक्रियेच्या अंतर्गत विदेश मंत्रालयाद्वारे त्याची माहिती कळवावी लागेल. आम्ही नागरिकत्वाची पडताळणी करू, दावा योग्य आढळल्यास आम्ही त्या व्यक्तीला योग्य कायदेशीर प्रक्रियेद्वारे परत आणू. अन्य कुठल्याही मार्गाने कुणाला प्रवेश करू देणार नाही असे सलाहुद्दीन यांनी नमूद केले आहे.
भारत सातत्याने सोपवितोय यादी
भारतात अवैध वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात कायद्यांच्या अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येत आहे. भारताने नागरिकत्व पडताळणीसाठी बांगलादेशला 2680 हून अधिक नावांची यादी सोपविली आहे. अनेक प्रकरणांमध्ये पडताळणी प्रक्रिया 5 वर्षांपेक्षा अधिक काळापासून प्रलंबित आहे. या घुसखोरांच्या नागरिकत्वाच्या पडताळणीला वेग द्यावा असा आग्रह भारताने बांगलादेशला केला आहे.
Source link



