मळगाव बाजारपेठेत वारंवार वीज खंडित

ग्रामस्थ आक्रमक
न्हावेली /वार्ताहर
मळगाव बाजारपेठेत वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने रस्तावाडीतील ग्रामस्थ आज चांगलेच आक्रमक झाले. सध्या परिसरात प्रचंड उष्णतेची लाट असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच सतत होत असलेल्या वीजपुरवठ्याच्या खेळखंडोब्यामुळे ग्रामस्थांचा संयम सुटला होता. त्यामुळे वीज वितरण अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली.ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे महावितरणचे अधिकारी श्री. खांडेकर यांनी अतिरिक्त कर्मचारी मागवून घेत एकत्र झालेल्या तारा मोकळ्या करण्याचे काम हाती घेतले आणि अखेर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.दरम्यान, पंचायत समिती सदस्य गौरव मुळीक यांनी घटनास्थळी भेट देत रस्तावाडीतील ग्रामस्थांशी चर्चा केली. वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील,असे आश्वासन त्यांनी दिले.यावेळी ग्रामस्थांनी कमी दाबाने होत असलेल्या वीजपुरवठ्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत परिसरात नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याची मागणी केली. तसेच मुख्य वीजवाहिनीला लागून असलेल्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याबाबत अनेकदा निवेदन देऊनही महावितरणकडून कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.विशेष म्हणजे, गावातील वायरमन संतोष गावकर हे सुट्टीवर असूनही ग्रामस्थांच्या मदतीसाठी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी सेवा बजावली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ गावकर, तुळशीदास नाईक, संदेश सोनुर्लेकर, निलेश चव्हाण, नितेश तेली, सिद्धेश तेंडोलकर, रामा देवळी, समीर परब, गुरु सोनुर्लेकर, अथर्व धुरी, दाजी सोनुर्लेकर, ज्ञानेश्वर राणे, जोतिबा टपाले, स्वप्नील नार्वेकर, संदेश नार्वेकर,मनोज रेडकर, मदन शिरोडकर,अर्जून परब, नितिन राऊळ, दिपक राऊळ, देवानंद नार्वेकर, प्रशांत पार्सेकर, रुपेश खडपकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व व्यापारी उपस्थित होते.
Source link



