कृषी विभागाच्या जाचक अटींमुळे शेतकरी हैराण

सावंतवाडी खरेदी – विक्री संघाकडून चिंता व्यक्त
न्हावेली /वार्ताहर
अतिवृष्टी, बदलते हवामान आणि वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात खतांच्या प्रचंड महागाईचा मोठा फटका बसला आहे. एकीकडे खतांचे दर गगनाला भिडले असताना, दुसरीकडे युरिया खत खरेदी करताना सातबारा उतारा आणि शेतकरी ओळखपत्र (फार्मर आयडी) सक्तीचे केल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे सोडून कागदपत्रांसाठी धावपळ करावी लागत आहे. कृषी विभागाच्या या जाचक अटींमुळे शेतकरी कमालीचे नाराज झाले असून, त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची चिंता सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांनी व्यक्त केली आहे.सावंतवाडी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या मासिक बैठकीत खरीप हंगामातील पीक आणि खतांच्या वाढत्या दरांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला उपाध्यक्ष राजन रेडकर, माजी सभापती प्रमोद सावंत, संचालक विनायक राऊळ, शशिकांत गावडे,प्रवीण देसाई, दत्ताराम हरमलकर,रश्मी निर्गुण, अभिमन्यू लोंढे आणि व्यवस्थापक महेश परब उपस्थित होते. या वेळी उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली.
Source link



