आंतरराष्ट्रीय सीमांनजीकची बेकायदेशीर बांधकामे पाडा!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आदेश : 15 किलोमीटरच्या परिघातील क्षेत्रात होणार कारवाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय सीमेच्या 15 किलोमीटरच्या परिघात आपल्या शून्य-सहिष्णुता धोरणाची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना या धोरणाची कठोर अंमलबजावणी करण्याचे आणि देशभरातील सर्व आंतरराष्ट्रीय सीमांच्या 15 किलोमीटरच्या परिसरातील सर्व बेकायदेशीर बांधकामे पाडण्याचे निर्देश दिले आहेत.
केंद्र सरकारचे लक्ष गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय सीमांवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर आहे. भारताच्या नऊ देशांशी आंतरराष्ट्रीय सीमा जोडलेल्या असून त्यात अंदाजे 15,107 किलोमीटरची भू-सीमा आणि सुमारे 7,517 किलोमीटरचा विस्तीर्ण किनारा समाविष्ट आहे.
सीमावर्ती जिह्यांमधील जिल्हाधिकाऱ्यांना विशेष जबाबदारी
गृह मंत्रालयाने सीमावर्ती भागांतील जिल्हाधिकाऱ्यांवर अनेक अतिरिक्त जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. सीमावर्ती भागांतील बँकांमार्फत होणाऱ्या सर्व व्यवहारांसाठी कायदेशीर आणि आर्थिक नियमांचे पालन सुनिश्चित करण्यास जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. मोठ्या व्यावसायिक संस्था आणि त्यांच्या निधीच्या स्त्राsतांची चौकशी करणे, अवैध व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या बनावट खाती (म्युल अकाउंट्स) आणि शेल कंपन्यांची चौकशी करणे, बनावट आधार कार्ड ओळखणे आणि सीमापार तस्करीला आळा घालणे यावरही लक्ष ठेवले जाणार आहे. गृह मंत्रालयाने सीमापार तस्करी आणि संशयास्पद हालचालींवर कडक देखरेख ठेवण्याचे आवाहनही केले आहे.
बिकानेरमध्ये सुरक्षा बैठक
गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी राजस्थानमधील बिकानेर येथे भारत-पाकिस्तान सीमेवरील सीमावर्ती जिह्यांमधील सुरक्षाविषयक मुद्यांचा आढावा घेण्यासाठी एका बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. या बैठकीला राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, बिकानेर, जैसलमेर, बारमेर, श्रीगंगानगर आणि फलोदी या पाच सीमावर्ती जिह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक (एसपी), तसेच राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
भारताच्या भू-सीमांना लागून असलेले देश :
बांगलादेश
चीन
पाकिस्तान
नेपाळ
म्यानमार
भूतान
अफगाणिस्तान
भारताच्या किनारपट्टीला लागून असलेले देश :
श्रीलंका
मालदीव
Source link



