Satara News | उंब्रजचा ‘चाफळ रोड’ की कचरा डेपो? ३० वर्षांपासून घाणीचे साम्राज्य कायम; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

चाफळ रोडवरील कचऱ्याच्या समस्येने नागरिक त्रस्त
उंब्रज : उंब्रज येथील राज्यमार्गावर महावितरण कार्यालयाच्या भिंतीपासून लक्ष्मीनगरपर्यंत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लक्ष्मीनगर शेजारील परिसर उकिरड्यात रूपांतरित झाला असून, दुर्गंधीमुळे नागरिक, विद्यार्थी आणि वाहनधारक त्रस्त झाले आहेत. कितीही वेळा कचरा उचलला तरी अवघ्या दोन-चार दिवसांत पुन्हा घाणीचे ढिगारे साचत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
जूर उंब्रजचा सर्वात चांगला भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम उंब्रजची ओळख आता घाणीमुळे मलिन होताना दिसत आहे. बेशिस्त नागरिकांकडून रस्त्याकडेला सर्रास कचरा टाकला जात आहे. परिणामी परिसरात रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. वर्दळीच्या या रस्त्यावरून प्रवासकरताना नागरिकांना नाकावर रुमाल ठेवावा लागत आहे.
अनेक वेळा रस्त्यावरच कचरा पसरलेला असल्याने पादचारी व दुचाकीस्वारांच्या अंगावर घाण उडण्याचे प्रकार घडत आहेत. विशेष म्हणजे लहान मुले, महिला आणि वृद्धांकडूनही या परिसराचा शौचविधीसाठी वापर केला जात असल्याने दुर्गंधी अधिकच वाढली आहे. ग्रामपंचायतीकडून वेळोवेळी स्वच्छतामोहीम राबवून कचरा उचलला जात असला तरी, ठोस उपाययोजना आणि कठोर कारवाईअभावी परिस्थिती ‘जैसे थे’च राहिली आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीने संयुक्तपणे या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची होत आहे. चाफळ रोडवरील ही समस्या आजची नसून तब्बल ३० वर्षांपासून कायम आहे. या काळात रस्त्यावर अनेकदा डांबरीकरण झाले, मोठमोठ्या इमारती उभ्या राहिल्या, अनेक अधिकारी आणि लोकप्रतिनिधी या रस्त्याने ये-जा करत राहिले; मात्र घाणीच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाय झाला नाही.
उपाययोजनांची गरज
उंब्रज गावच्या हद्दीतून मायणी-मल्हारपेठ हा रस्ता जातो. सध्या या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रुंदीकरणाच्या कामात हलगर्जीपणा होत आहे. अद्याप ठेकेदाराने उंब्रज येथे काम करण्यास सुरुवात केलेली नाही. काम सुरू करण्यापूर्वी येथील घाणीचे साम्राज्य बाजूला करून रस्त्याच्या कडेला नाल्यांचे बांधकाम करणे अत्यावश्यक आहे. तसेच नाल्यात कचरा टाकला जाऊन नाला तुबंण्याची शक्यता आहे.
Source link



