“राहुल गांधींबाबत फडणवीस जे बोलले ते चुकीचं” शरद पवारांनी मोदींनाही दिला सल्ला

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी काही मध्यपुर्वेतल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीचे आवाहन केले होते. इंधनाच्या खरेदीवर खर्च होणारे परकिय चलन वाचवण्यासाठी सर्वांनी काटकसरीने पेट्रोल, डिझेलचा वापर करावा असं मोदींंनी सांगितले होते. त्यांच्या या आवाहनावर आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार काय म्हणाले?
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलं आहे त्याची नोंद सगळ्यांनी घेतली पाहिजे. प्रश्न गंभीर आहे, स्थिती गंभीर आहे. मी विनंती केली आहे की अशा वेळेला सर्वपक्षिय नेत्यांची बैठक बोलावणे गरजेचे आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थित राहावं. याआधीही सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठका झाल्या होत्या पण त्या बैठकांना नरेंद्र मोदी उपस्थित नव्हते. कधी राजनाथ सिंह होते तर कधी आणखी कुणी. देशावर किती गंभीर परिणाम होतील हे सांगण्याचा पंतप्रधान प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सर्वपक्षीय बैठकीला नरेंद्र मोदींनी उपस्थित राहिलं पाहिजे.
लोकसत्ताने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार शरद पवार म्हणाले की मी सकाळपासून पाहतोय कुणी मोटरसायकलवरुन येत आहे, कुणी ऑफिसला चालत जातो आहे, एका मंत्र्याने जाहीर केले की मी माझ्या कार कमी केल्या १७ होत्या त्या ८ केल्या. मुळात १७ कार का होत्या हा मला प्रश्न पडला आहे. मंत्री गांभीर्याने विचार करत आहेत. अशी स्थिती देशात पुर्वी निर्माण झाली नव्हती असं नाही. पण एकंदरित देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर स्थिती येईल त्यामुळे सर्वांनी एकमेकांना सहकार्य करायला हवं.
फडणविसांना सल्ला
राहुल गांधींबाबत मुख्यमंत्री फडणविसांनी जे शब्द वापरले ते अयोग्य वाटले. राहुल गांधी हे संसदेत विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षनेता हे घटनात्मक आणि लोकसभेचं पद आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल असं बोलणं योग्य नाही असं शरद पवार म्हणाले.
Source link



