“मोदी आमच्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत” नॉर्वेच्या महिला पत्रकाराचा परराष्ट्र सचिवांशी वाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोअर यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेदरम्यान, नॉर्वेजियन पत्रकार हेले लिंग यांनी एक प्रश्न विचारला. पंतप्रधान मोदींनी आपल्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेदरम्यान, आपण भारतावर विश्वास का ठेवावा, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या मुद्द्यावरून आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.
नॉर्वेमधील पत्रकार प्रश्न घेत नसल्याच्या आरोपांवरून, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टोला लगावत म्हटले की, “जेव्हा लपवण्यासारखे काहीच नसते, तेव्हा घाबरण्याची गरज नसते.” त्यांनी हा व्हिडिओ ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअरही केला आहे.
वाद काय आहे?
पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी ओस्लो येथे त्यांचे समकक्ष जोनास गहर स्टोर यांच्यासोबत बैठक घेतली. बैठकीदरम्यान, एका पत्रकाराने पंतप्रधान मोदींना काही प्रश्न विचारले. पंतप्रधान मोदी व्यासपीठावरून निघत असताना, पत्रकार हेले लिंग यांनी विचारले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुम्ही जगातील सर्वात स्वतंत्र माध्यमांच्या काही प्रश्नांची उत्तरे का देत नाही?”
परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत, पंतप्रधान मोदींनी आपल्या प्रश्नांची उत्तरे न दिल्याबद्दल हेली लिंग यांनी चिंता व्यक्त केली. त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला भारतातील पत्रकार स्वातंत्र्य आणि मानवाधिकार मुद्द्यांवर प्रश्न विचारले, तसेच भारतावर विश्वास का ठेवावा असा प्रश्न उपस्थित केला. यादरम्यान, परराष्ट्र सचिव (पश्चिम) सिबी जॉर्ज यांच्यासोबत त्यांचा जोरदार वादही झाला.
परराष्ट्र मंत्रालय काय म्हणाले?
परराष्ट्र मंत्रालयाने मानवाधिकार परिस्थितीबाबतच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर दिले. मंत्रालयाने म्हटले की, “अज्ञानी स्वयंसेवी संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालांच्या आधारे अनेक लोक भारताला चुकीच्या पद्धतीने समजून घेतात.”
जॉर्ज म्हणाले, “तुम्हाला माहीत आहे इथे किती बातम्या येतात. आमच्याकडे रोज संध्याकाळी इतक्या ब्रेकिंग न्यूज असतात. एकट्या दिल्लीतच इंग्रजी, हिंदी आणि इतर अनेक भाषांमध्ये किमान २०० टीव्ही चॅनल्स आहेत.
लोकांना भारताच्या विशालतेची कल्पनाच नाही. त्यांना त्याची काहीच समज नाही. ते एखाद्या अज्ञात आणि अज्ञानी स्वयंसेवी संस्थेने प्रसिद्ध केलेली एक-दोन बातमी वाचतात आणि मग येऊन प्रश्न विचारतात.”
Source link



