सफाई कामगारांच्या वारसांना नोकरी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई

आयुक्त अभिषेक कृष्णा यांचे आश्वासन
सावंतवाडी । प्रतिनिधी
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, उच्च न्यायालयाचेऔरंगाबाद खंडपीठ आणि नगरपालिका प्रशासन संचालनालयाचे स्पष्ट आदेश असतानाही सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी देण्यासंदर्भात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर 31 मे २०२६ नंतर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन नगरपरिषद प्रशासन संचालनालय आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिले आहे . राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायती मधील सफाई कामगारांच्या वारसांना वारसा हक्काने नोकरी मिळण्यासाठीची प्रकरणे सावंतवाडी नगरपरिषद, उरण नगरपरिषद आणि काही तुरळक ठिकाणी प्रलंबित असून यासंदर्भात माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या नेतृत्वाखाली कामगार नेते संतोष पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मुंबई येथे लक्ष वेधले. याची तात्काळ दखल घेत मंत्री उदय सामंत यांनी नगरपरिषद प्रशासन संचालनालय आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. “संबंधित अधिकारी विनाकारण अडवणूक करत असतील तर अशा अधिकाऱ्यांवर 31 मे 2026 नंतर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल.”असा स्पष्ट इशारा आयुक्तांनी यावेळी दिला . या बैठकीस सावंतवाडी नगरपरिषदेचे सफाई कामगारांचे वारस श्री. गोपाळ नामदेव सावंत, श्री. सुनिल नारायण परब, श्री. नितीन सदानंद कदम आणि श्री. संदीप पाटील हे देखील उपस्थित होते. त्यांनी आपली व्यथा मंत्रीमहोदयांसमोर मांडली.शासनाचे स्पष्ट आदेश असूनही मुख्याधिकारी पातळीवर फाईल अडवून ठेवली जात असल्याने अनेक सफाई कामगार कुटुंबे न्यायापासून वंचित आहेत. त्यामुळे आयुक्तांच्या आश्वासनामुळे आता कारवाईची अपेक्षा वाढली आहे.
Source link



