Uncategorized

भाजपची नवीन टीम जाहीर; स्मृती इराणी, राम माधव आणि वसुंधरा राजे यांची एंट्री , तेरा राष्ट्रीय उपाध्यक्ष असणार

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाच्या नव्या राष्ट्रीय टीमची घोषणा केली आहे. नव्या टीममध्ये अनेक अनुभवी आणि चर्चेतील नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम माधव यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण 13 नेत्यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

नव्या टीममध्ये माजी केंद्रीय मंत्री आणि अमेठीच्या माजी खासदार स्मृती इराणी यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनाही राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. एकूण सात राज्यांतील आठ नेत्यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशला विशेष महत्त्व

नव्या संघटनेत उत्तर प्रदेशला विशेष स्थान देण्यात आल्याचे दिसून येते. स्मृती इराणी यांच्यासोबत उत्तर प्रदेशातील माजी खासदार हरीश द्विवेदी यांचीही राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी राजकीय आव्हानांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील संघटनात्मक ताकद वाढवण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे.

वसुंधरा राजे आणि राम माधव यांच्या नियुक्तीची चर्चा

नव्या संघटनेच्या घोषणेनंतर सर्वाधिक चर्चा वसुंधरा राजे आणि राम माधव यांच्या नियुक्तीची होत आहे. गेल्या काही काळात दोन्ही नेते भाजपच्या सक्रिय केंद्रीय राजकारणात तुलनेने कमी दिसत होते. त्यामुळे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांना पुन्हा महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याने पक्षाच्या आगामी रणनीतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

वसुंधरा राजे या राजस्थानातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. तर राम माधव यांनी संघटनात्मक पातळीवर तसेच ईशान्य भारत आणि जम्मू-काश्मीरशी संबंधित राजकीय विषयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

विनोद तावडे, स्मृती इराणी यांच्यावर मोठी जबाबदारी

भाजपने संघटनेत फेरबदल करताना अनुभवी नेत्यांवर विश्वास कायम ठेवला आहे. विनोद तावडे आणि स्मृती इराणी यांना राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पक्षाचे संघटन अधिक मजबूत करणे आणि पक्षाची रणनीती तळागाळापर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर असेल. माजी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

13 राष्ट्रीय उपाध्यक्षांची नियुक्ती

भाजपच्या नव्या राष्ट्रीय संघटनेत वसुंधरा राजे, राम माधव यांच्यासह तीर्थसिंह रावत, बैजयंत पांडा, डी. पुरंदेश्वरी, रेखा वर्मा, वर्षाबेन नरेंद्रभाई दोशी, भारती प्रवीण पवार, मनप्रीत सिंग बादल, लालसिंग आर्य, एम. नागराजा, तारिक मन्सूर आणि मधुचंद्र कर यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

या नियुक्त्यांमध्ये विविध राज्यांना प्रतिनिधित्व देण्यासोबतच सामाजिक आणि प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसून येते.

अनुभवी चेहरे आणि प्रादेशिक समतोलाचा संदेश

नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली जाहीर झालेल्या नव्या संघटनेत अनुभवी नेत्यांसोबत विविध राज्यांतील नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे संघटनात्मक अनुभव, प्रादेशिक समतोल आणि आगामी राजकीय आव्हानांचा विचार करून नव्या टीमची रचना करण्यात आल्याचे मानले जात आहे.

विशेषतः वसुंधरा राजे आणि राम माधव यांना पुन्हा राष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने भाजपच्या आगामी राजकीय आणि संघटनात्मक रणनीतीत या दोन्ही नेत्यांची भूमिका महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​