Uncategorized

Sangli Solar system collapses अवकाळीने उडालेली सोलर यंत्रणा पडून, पंचनामा नाही, विमा नाही : जतपूर्व भागातील शेतकरी संतप्त

रामण्णा सनाळे, संख

गेल्या वर्षी २१ मे २०२५ रोजी झालेल्या अवकाळी पावसाने जत परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बसवलेली सोलर पंप यंत्रणा उखडून उडून ती दुसऱ्या ठिकाणी जाऊन पडली. या घटनेनंतर शेतकऱ्यांनी तात्काळ संबंधित कंपनीला कळवले व सदर कंपनीने सांगितल्याप्रमाणे सर्व डॉक्युमेंट्स सदर कंपनीकडे फोटो सहित पाठवून दिले आहेत. परंतु आज जवळपास एक वर्ष उलटून गेले तरीही संबंधित कंपनीकडून नुकसानाचा पंचनामा झालेला नाही.

शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आजही सोलरचे लोखंडी फ्रेम, पॅनल व साहित्य पडून आहे. त्याची दुरुस्ती न झाल्यामुळे ते वापरात येत नाही. परिणामी विहिरीत व बोअरमध्ये पाणी पिण्यापुरते उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना पाणी उपसा करता येत नाही. त्यामुळे अगोदरच दुष्काळ सामना करत असलेले शेतकरी केवळ संबंधित कंपनीमुळे आज आर्थिक अडचणीत आहेत.

सोलर यंत्रणा बसवताना शेतकऱ्यांनी मोठ्या कर्जावर किंवा अनुदानासह हजारो रुपये भरून ही योजना घेतली होती. शेतीसाठी विजेच्या समस्येवर उपाय म्हणून सरकारने सोलर योजना दिली असली तरी प्रत्यक्षात नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याने ती योजना शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. नुकसान झाल्यानंतर संबंधित विभागाला वारंवार कळवूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केलेली नाही. काही अधिकाऱ्यांनी विमा कंपनीला कळवले असल्याचे सांगितले असले तरी आजपर्यंत विमा कंपनीचा एकही प्रतिनिधी शेतकऱ्यांकडे फिरकलेला नाही. त्यामुळे विमा प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सोलर बसवणाऱ्या पुरवठादार कंपनीवरही शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “यंत्रणा बसवताना हमी दिली, पण नुकसान झाल्यावर कोणीही विचारत नाही,” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली. जतपूर्व भागामधील शेतकऱ्यांची मागणी आहे की, तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा. सोलर यंत्रणा दुरुस्त करून द्यावी किंवा नवीन बसवावी. विमा कंपनीकडून त्वरित नुकसानभरपाई मिळवून द्यावी अन्यथा संबंधित शेतकरी ग्राहक न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देत आहेत.

तात्काळ संबंधित कंपनीने सहजपर शेतकऱ्यांचा सोलर यंत्रणा दुरुस्त न दिल्यास आंदोलन करण्याचाही इशाराही यावेळी देण्यात आला. एक वर्ष उलटूनही न्याय न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत असून “योजना कागदावरच, मदत शून्य” अशी भावना व्यक्त होत आहे. आतासदर कंपनीने जागे होऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित होत आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​