Ratnagiri News भाट्येतील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र ठरले देशात सर्वोत्कृष्ट!

त. भा. प्रतिनिधी
रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्राला सन २०२५ – २६ वर्षाचा देशातील बागायती उपवन पिकामध्ये काम करणारे सर्वोत्कृष्ट संशोधन केंद्र म्हणून केरळ येथे सन्मानित करण्यात आले.
संशोधन केंद्राचे केंद्रप्रमुख डॉ. किरण मालशे आणि कीटकशास्त्रज्ञ डॉ. संतोष वानखेडे यांनी पुरस्कार स्वीकारला.
या संशोधन केंद्रावर गेली ७१ वर्षे नारळ या पिकावर पीक सुधार, उत्पादन तंत्रज्ञान आणि पीक संरक्षण यावर संशोधन कार्य सुरू आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद, अंतर्गत केरळमधील कासारगोड येथे अखिल भारतीय समन्वित उपवन पिके संशोधन प्रकल्प आहे. संशोधन केंद्रावर केलेल्या संशोधन आधारित निष्कर्ष, तंत्रज्ञान आणि विस्तार कार्य याबाबतची वार्षिक आढावा सभा कासारगोड येथे नुकतीच संपन्न झाली. यामध्ये केंद्राला गौरविण्यात आले. नारळाच्या विविध वाणांच्या बहुस्थानी चाचण्या, उत्पादन तंत्र, आंतरपिके आणि पीक संरक्षण यांचा आढावा सादर करण्यात आला.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे आणि संबंधित विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या संशोधन कार्याची ही पोच पावती असल्याचे डॉ. मालशे यांनी सांगितले.
Source link



