ग्रेट निकोबार प्रकल्पावर राहुल गांधींचा पुन्हा आक्षेप

हॉटेल-कॅसिनोसाठी वृक्षतोड होत असल्याचा दावा
वृत्तसंस्था , नवी दिल्ली
ग्रेट निकोबार बेट प्रकल्प संरक्षण अन् मालवाहतूक बंदराशी संबंधित असल्याचा केंद्र सरकारचा युक्तिवाद आहे, परंतु तो खोटा असून प्रत्यक्षात भारताच्या सर्वात अमूल्य निसर्गसंपदेवर एका उद्योजकाला हॉटेल आणि कॅसिनो तयार करण्यास मदत केली जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला आहे.
आयएनएस बाज प्रकल्पाचा विस्तार करण्याची मागणी नौदल मागील 5 वर्षांपासून करत आहे, ज्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तर आता सरकार ग्रेट निकोबार प्रकल्प मालवाहतूक बंदराविषयी असल्याचे सांगत आहे. भारतात यापूर्वीच केरळमध्ये अशाप्रकारचा प्रकल्प निर्माण होतोय. ग्रेट निकोबार प्रकल्पासाठी 1.5 कोटी झाडांची कत्तल करण्यात आली आहे. सरकारी नकाशावरून प्रवाळक्षेत्रांना हटविण्यात आले. सैनिक आणि आदिवासींना विस्थापित करण्यात आल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
हे बेट जगातील सर्वात असाधारण शाश्वत पर्यटनस्थळ ठरू शकते. याच भारतासाठी लढणे सार्थक आहे. परंतु मोदी हे इच्छित नाही. तेथे पैशांचा वापर करून हॉटेल, कॅसिनो आणि रियल इस्टेट निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. ज्या क्षेत्रात हा प्रकल्प होतोय, त्याचा आकार नवी दिल्लीपेक्षा चारपट अधिक आहे. सरकार या प्रकल्पाची उभारणी देशातील सर्वात स्वच्छ पर्यावरणीय वातावरणात करत आहे. सरकार गौतम अदानींना मदत करू पाहत आहे. हा उद्योजक भारतीय भूमी हडपण्यासाठी नौदल आणि सैन्याचा आडोसा घेतोय असा दावा राहुल गांधी यांनी केला आहे.
हॉटेल, गेस्ट हाउस कशासाठी?
हॉटेल आणि गेस्ट हाउस आमच्या देशाच्या संरक्षणात कशाप्रकारे भूमिका बजावू शकतात हे कृपया मला समजावून सांगा. या जंगलात प्रति हेक्टर 145 वृक्षं असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येतोय. प्रत्यक्षात या जंगलात काही मीटरच्या कक्षेत 145 वृक्षं आहेत. सरकार 1.5 कोटी वृक्ष चोरू पाहत आहे, यातील प्रत्येक वृक्षाची किंमत 3 लाख रुपये आहे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
Source link



