साताऱ्यात रोहित पवार यांची कायदा-सुव्यवस्था, शक्ती कायदा व जिल्हा परिषद वादावर टीका

Rohit Pawar on Sunetra Pawar |आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत विविध राजकीय व सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करत राज्य सरकारवर टीका केली. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या कार्यपद्धतीचा उल्लेख करत, “पवार साहेब मराठी माणसाचे प्रतीक आहेत. संघर्ष, यश आणि विचार जपण्याची त्यांची परंपरा आहे; मात्र यश मिळूनही त्यांच्यात अहंकार दिसत नाही,” असे सांगितले. “साहेब लोकांमध्ये आले की कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होतो आणि साहेबांमध्येही तोच उत्साह जाणवतो,” असेही ते म्हणाले.
“कायद्याची भिती उरली नाही”
राज्यातील वाढत्या अत्याचारांच्या घटनांकडे लक्ष वेधत पवार यांनी कायद्याची भीती उरलेली नसल्याची टीका केली. महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायद्याची गरज असून ‘शक्ती कायदा’ लागू करण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली. नऊ महिन्यांपूर्वी साताऱ्यात घडलेल्या अल्पवयीन पीडितेच्या कुटुंबीयांची आपण भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी सुनेत्रा पवार यांच्या २०२९ मधील संभाव्य निवडणुकीबाबत विचारले असता, “तो त्यांच्या पक्षाचा व वैयक्तिक निर्णयाचा विषय आहे,” असे उत्तर त्यांनी दिले.
सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार देणार का?
सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार देणार का? या प्रश्नावर त्यांनी मिश्किल प्रतिक्रिया देत वारंवार तोच प्रश्न विचारला जात असल्याचे नमूद केले. सातारा जिल्हा परिषदेमध्ये निवडून आलेल्या सदस्यांवर दबाव टाकून फोडाफोडी केल्याचा आरोप करत पवार यांनी भाजपवर टीका केली. भविष्यातही अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
निदा खान अटकेच्या मुद्द्यावर बोलताना पवार यांनी काही राजकीय नेत्यांवर टीका केली. तसेच गोपीचंद पडळकर यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. यावेळी एमआयएम पक्षाच्या संदर्भातही त्यांनी राजकीय आरोप केले.
पक्षातील मतभेदावर रोहित पवार काय म्हणाले?
पक्षातील मतभेदांवर बोलताना, कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून लढण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. या संदर्भात शशिकांत शिंदे यांच्यासह वरिष्ठ नेते लक्ष घालतील, असे ते म्हणाले. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असतानाही सरकारचे लक्ष राजकारणातच असल्याची टीका पवार यांनी केली. ‘शक्ती कायदा’ मागणीवरून टीका करणाऱ्यांनी कायद्याचा अभ्यास करून बोलावे, असा टोला त्यांनी लगावला.
जिल्हा परिषद सदस्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार का, या प्रश्नावर त्यांनी सत्ताधारी पक्षांवर अप्रत्यक्ष टीका करत, “झालं ते झालं, अशी भूमिका घेतली जाऊ शकते,” असे सूचक वक्तव्य केले
Source link



