कोचीहून अबू धाबीला जाणाऱ्या विमानात तेलाची गळती; ५० मिनिटांत विमान पुन्हा कोचीत, मोठा अपघात टळला

कोची : एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातील क्रू मेंबर्सच्या सतर्कतेमुळे मोठा विमान अपघात टळल्याची घटना समोर आली आहे. कोचीहून अबू धाबीला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या IX 415 या बोईंग 737 विमानाच्या इंजिन क्रमांक-1 मधील तेलाची पातळी अचानक वेगाने कमी होऊ लागली. संकटाची जाणीव होताच क्रू मेंबर्सने विमान पुन्हा कोचीकडे वळवण्याचा निर्णय घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, विमानाने कोची विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर सुमारे 50 मिनिटांनी इंजिनमधील तेलाची पातळी कमी होत असल्याचे क्रू मेंबर्सच्या लक्षात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून इंजिन क्रमांक-1 ला होणारा तेलपुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर विमान हवेतच वळवून कोची विमानतळाकडे आणण्यात आले.
विमानाचे कोची विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचे सांगितले जात आहे. विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
विमानाने पुन्हा उड्डाण केले नाही
एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, IX 415 हे विमान कोचीहून अबू धाबीच्या दिशेने निघाले होते. मात्र इंजिनमधील तांत्रिक समस्या लक्षात आल्यानंतर ते नियोजित प्रवास पूर्ण न करता कोचीला परत आणण्यात आले. लँडिंगनंतर विमानाने पुन्हा उड्डाण केले नसल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेबाबत एअर इंडिया एक्स्प्रेस किंवा एअरपोर्ट अथॉरिटीकडून अद्याप अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. विमानातील तांत्रिक बिघाडाची कारणे आणि पुढील तपासाबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
Source link



