The futures of India and New Zealand are interdependent.

पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन, विदेश दौरा यशस्वी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि न्यूझीलंड यांचे भवितव्य परस्परावलंबी आहे. व्यापारवृद्धी आणि जागतिक शांतता ही ध्येय साध्य करण्यासाठी दोन्ही देशांना एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे. दोन्ही देशांमधील भागीदारी नव्या उंचीवर पोहचली असून ती आणखी वृद्धिंगत होणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे केला आहे. न्यूझीलंडचा आपला दौरा यशस्वी झाला असून अनेक महत्वाचे करार त्यात करण्यात आले, अशी भलावण त्यांनी केली.
अवकाश संशोधन, तंत्रज्ञान विकास, संरक्षण आदी क्षेत्रांपासून रग्बीच्या खेळापर्यंत सर्वत्र दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करीत आहेत. हे सहकार्य केवळ लोकसंख्या आणि आर्थिक संबंधांमधील नाही. तर भविष्याचा वेध घेऊन केलेली ही भागीदारी आहे. दोन्ही देशांना यापुढे बऱ्याच आंतरराष्ट्रीय विषयांमये एकत्रितरित्या काम करण्याची आवश्यकता भासणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
40 वर्षांमध्ये प्रथम दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा न्यूझीलंड दौरा भारताच्या कोणत्याही नेत्याने गेल्या चाळीस वर्षांमध्ये केलेला त्या देशाचा प्रथम दौरा आहे. त्यामुळे तो विशेष महत्वाचा मानण्यात आला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुक्त व्यापार करार झाला असून दोन्ही देशांनी तो मान्य केला आहे. परिणामी, आगामी काळात दोन्ही देशांचा परस्पर व्यापार मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
चांद्रयान-3 अभियान
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अवकाश संशोधन क्षेत्रात मोठे सहकार्य होत आहे. भारताने नुकतेच आपले ‘चांद्रयान-3’ हे अभियान यशस्वी केले. या अभियानात न्यूझीलंडचे महत्वाचे योगदान होते. त्याचा आवर्जून उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित भारतीय वंशाच्या नागरीकांच्या कार्यक्रमात केला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात क्रीडा क्षेत्रात असलेल्या संबंधांचे हे 100 वे वर्ष आहे. 100 वर्षांपूर्वी भारताच्या हॉकी संघाने न्यूझीलंडचा दौरा केला होता. त्यावेळी भारताचे विश्वविख्यात हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांनी न्यूझीलंड दौरा गाजविला होता. त्यांच्या क्रीडा कौशल्याचे कौतुक आजही होते, अशी भलावण त्यांनी केली.
तीन देशांचा दौरा सफल
इंडोनेशिया, ऑस्टेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांचा पाच दिवसांचा आपला दौरा सफल झाला आहे, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. इंडोनेशिया दौऱ्यात भारताने त्या देशाला ब्राम्होस क्षेपणास्त्रांची विक्री करण्याचा करार केला. तो भारताच्या संरक्षण उत्पादन क्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताने ऑस्टेलियाकडून युरेनियम विकत घेण्याचा करार केला. या द्विपक्षीय अणुऊर्जा करारामुळे भारतात स्वच्छ वीज निर्माण करण्याचा एक मार्ग मोकळा झाला आहे. पूर्वी ऑस्टेलियाने भारताला युरेनियम विकण्यास नकार दिला होता. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यशस्वी वाटाघाटी करुन हा करार करण्यात यश मिळविले. त्यामुळे अणुवीज निर्मितीसाठी आवश्यक युरेनियम भारताला आता आवश्यक त्या प्रमाणात मिळणार असून भारतात अणुवीजनिर्मितीचे प्रमाण वाढविणे आता शक्य होणार आहे. भारताने पुढच्या 10 वर्षांमध्ये आवश्यकतेच्या 20 टक्के वीज अणुतून मिळविण्याचे ठरविले आहे.
Source link



