52 हजार कोटींची शस्त्रखरेदी होणार

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेत घेतला गेला निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या संरक्षण खरेदी बैठकीत (डीएसी) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आपली संरक्षणव्यवस्था बळकट करण्यासाठी 52 हजार कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्र खरेदीला या बैठकीत सैद्धांतिक संमती देण्यात आली आहे. भूसेना, वायूसेना आणि नौसेना या तिन्ही दलांसाठी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे लवकरच खरेदी केली जाणार आहेत. तसेच शत्रूचे हल्ले निकामी करणारी शस्त्रेही विकत घेतली जाणार आहेत, अशी माहिती बैठकीनंतर देण्यात आली.
ही शस्त्रखरेदी प्रामुख्याने स्वदेशी कंपन्यांकडूनच केली जाणार आहे. भूसेनेसाठी ड्रोनविरोधी ‘आकाश तरंग’ ही शस्त्रप्रणाली घेतली जाणार आहे. तसेच खांद्यावरुन डागली जाऊ शकतील अशा रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांची प्रणालीही घेतली जाणार आहे. तसेच मध्यम अंतरावर मारा करू शकेल, अशी वायू सुरक्षा सामग्री, अत्यंत नजीक मारा करणारी वायू सुरक्षा यंत्रणा, आपल्या रणगाड्यांची सुरक्षा करण्याची क्षमता असणारी यंत्रणा, तसेच जेट आधारित आत्मघाती ड्रोन यंत्रणा, अशा विविध आक्रमणकारी आणि सुरक्षाकारी यंत्रणांचा खरेदीत समावेश केला जाणार आहे.
कोणत्याही वातावरणात सक्षम
खरेदी होणार असलेल्या सर्व शस्त्रास्त्र यंत्रणा, कोणत्याही हवामानात तसेच कोणत्याही परिस्थितीत काम करू शकतील अशा आहेत. सध्याच्या युद्धतंत्राला अनुसरून शस्त्रास्त्रांची निवड केली जाणार आहे. सध्या युद्धांमध्ये ड्रोनचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुळे भारतानेही आपले ड्रोन सामर्थ्य मोठ्या प्रमाणात वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. शत्रूवर ड्रोनचा हल्ला करणे, तसेच शत्रूने पाठविलेले ड्रोन आकाशातच निकामी करणे, अशी दुहेरी यंत्रणा भारतीय सैन्य दलांना उपलब्ध करून दिली जाणार आहे, असेही बैठकीनंतर स्पष्ट केले गेले.
नौसेनेचा विशेष विचार
नौसेनेसाठी महत्त्वपूर्ण शस्त्रांची खरेदी केली जाणार आहे. समुद्रात पेरले जाणारे पाणसुरुंग, युद्धनौकांवर स्थापित असणारी मानवरहीत विमाने आणि ड्रोन्स, तसेच विजेवर चालणारी प्रणोदन प्रणालीचा शोध घेण्यासाठी भूमीवर प्रस्थापित परीक्षण केंद्र नौदलाला उपलब्ध करून दिले जाणार आहे. या यंत्रणेमुळे समुद्रावर दूरवर दृष्टिक्षेप करणे आणि शत्रूच्या युद्धनौका तसेच पाणबुड्यांच्या हालचालींवर अचूक लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. यामुळे नौसेनेची मारक आणि संरक्षक क्षमता वाढणार आहे.
वायूसेनेसाठी देखरेख यंत्रणा
वायूसेनेची क्षमता वाढविण्यासाठी आकाशात प्रदीर्घ काळ तरंगत राहून शत्रूचे लक्ष्य टप्प्प्यात येताच त्याचा अचूक भेद करणारी दूरसंचालित यंत्रणा पुरविली जाणार आहे. सीमावर्ती भागांवर सातत्याने लक्ष ठेवणे, शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा, शत्रूची माहिती मिळविणारी यंत्रणा, अत्याधुनिक दूरसंचार साधने आणि क्षेपणास्त्रे यांचाही पुरवठा वायूदलासाठी निश्चित केला जाणार आहे. वेळप्रसंगी दोन किंवा तीन शत्रूंशी एकाचवेळी यशस्वी संघर्ष करावा लागला, तरी कोणतींही अडचण येऊ नये, इतकी बळकट सज्जता राखली जाणार आहे.
सर्वंकष आधुनिकीकरणाचे ध्येय
भारताच्या तिन्ही दलांचे नव्या काळानुसार अत्याधुनिकीकरण करण्यास केंद्र सरकारने प्रारंभ केला आहे. यासाठी खासगी क्षेत्रालाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. शस्त्रास्त्र निर्मितीत जास्तीत जास्त प्रमाणात आत्मनिर्भर होण्याचे भारताचे ध्येय आहे. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही वेळी शत्रूशी यशस्वीरित्या दोन हात करण्यात भारतीय सेनेला कोणतीही अडचण पडू नये, याची दक्षता घेतली जाणार असून ही खरेदी हा याच धोरणाचा भाग असल्याचे दिसून येते. भारतीय सेनादलांचे सर्वंकष आधुनिकीकरण करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार असून त्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञान संशोधनावरही मोठा भर देण्यात आला आहे.
कोणत्या शस्त्रांची होणार खरेदी
ड भूसेनेसाठी अत्याधुनिक रडार यंत्रणा, क्षेपणास्त्र आणि ड्रोन्स, दूरसंचार साधने
ड वायू दलासाठी आकाशात तरंगत राहून शस्त्रूचा अचानक भेद करणारी यंत्रणा
ड नौदलासाठी पाणसुरुंग, शत्रूच्या नौकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणारी शस्त्रास्त्रे
ड खांद्यावरून डागता येतील अशी रणगाडाविरोधी दूरनियंत्रित क्षेपणास्त्र यंत्रणा
Source link


