बिलावल भुत्तो यांची भारताला धमकी

सिंधू करार मोडल्यास अण्वस्त्रे डागण्याची दर्पोक्ती
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
भारताने सिंधू जलवितरण करार मोडल्यास भारतावर अण्वस्त्र हल्ला करू, अशी गर्भित धमकी पाकिस्तानचे नेते बिलावल भुत्तो यांनी दिली आहे. पाकिस्तानचा पाण्यावरचा अधिकाराची हानी भारताने केल्यास भारताला धडा शिकविला जाईल. तसेच पाकिस्तान मोठ्या प्रमाणात संघर्ष करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
पाकिस्तानने पहलगाम येथे क्रूर दहशतवादी हल्ला केल्यानंतर, भारताने पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी 1960 मध्ये करण्यात आलेला सिंधू जलवितरण करार स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच भारतातून पाकिस्तानात वहात जाणाऱ्या नद्यांचे जास्तीत जास्त पाणी भारतातच उपयोगात आणण्याच्या योजना भारताने कार्यान्वित करण्यास प्रारंभ केला आहे. तसेच पाणी मोठ्या प्रमाणात अडविण्याच्या नव्या जलसाठा आणि कालवे योजनाही सज्ज केल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तान धास्तावला असून त्याने आता अणुयुद्धाच्या धमकीचा आधार घेतला आहे. बिलावल भुत्तो यांनी एका मुलाखतीत या धमकीचा पुनरुच्चार केला आहे.
पाकिस्तानच्या अस्तित्वाचा प्रश्न
भारतातून वाहणाऱ्या सहा नद्या पुढे पाकिस्तानातून वाहणाऱ्या सिंधू नदीला मिळतात. सिंधू नदीच्या पाण्याचा हा मुख्य स्रोत आहे. भारताने या सहा नद्यांचे पाणी 50 टक्के अडविले, तरी पाकिस्तानात मोठे जलसंकट उभे राहू शकते. पाकिस्ताची 90 टक्के शेती आणि 60 टक्के उद्योगधंदे सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे भारताने हे पाणी अडविल्यास पाकिस्तानसमोर अस्तित्वाचे संकटही उभे राहू शकते. पाकिस्तान जरी अणुहल्ल्याची धमकी देत असला, तरी ते त्याचे उसने अवसान आहे, असे अनेक तज्ञांचे मत आहे.
भारताची कठोर भूमिका
पाणी आणि रक्त एकाच वेळी वाहू शकत नाही, ही भारताची भूमिका आहे. भारताला पाकिस्तानशी सौहार्दपूर्ण संबंध हवे आहेत. तथापि, पाकिस्तानला त्यासाठी दहशतवाद सोडावा लागेल. जो पर्यंत पाकिस्तान दहशतवादाला पोसत राहील, तो पर्यंत त्या देशाच्या विरोधात भारताची भूमिका कठोरच राहील. आम्ही अणुहल्ल्याच्या पोकळ धमकीला भीक घालणार नाही. तसेच पाकिस्तानकडून येणारा कोणताही दबाव स्वीकारणार नाही, अशी स्पष्टेंक्ती भारताने वारंवार केली आहे.
अनेकदा अणुहल्ल्याची धमकी
पाकिस्तानच्या अनेक नेत्यांनी भारताला यापूर्वीही अनेकदा अणुहल्ल्याची धमकी दिली आहे. बिलावल भुत्तो यांनीही 2025 मध्ये अशीच धमकी दिली होती. तथापि, अण्वस्त्रांचा उपयोग करणे हे वाटते तितके सोपे नाही. भारताकडेही अण्वस्त्रे आहेत. दोन्ही देशांमध्ये अणुयुद्ध झालेच तर पाकिस्तानची हानी अधिक होणार आहे. कारण भारतासारखी विस्तृत भूमी त्याच्याकडे नाही. तसेच, पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचे नियंत्रण पाकिस्तानकडेच आहे की अमेरिकेकडे, हाही प्रश्न अनेकदा आला आहे. भारताच्या संदर्भात हा प्रश्न येत नाही, असे तज्ञांचे मत आहे.
Source link



