Satara News वाठार पोलिसांकडून हरवलेले 25 मोबाईल शोधून मूळ मालकांना परत

प्रतिनिधी सातारा
वाठार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने आणि सायबर पोलीस ठाणे, सातारा यांच्या संयुक्त प्रयत्नातून नागरिकांचे हरविलेले तब्बल 6 लाख 15 हजार रुपये किमतीचे 25 मोबाईल फोन शोधून काढत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. हस्तगत करण्यात आलेले सर्व मोबाईल संबंधित मालकांना परत देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. वाठार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांनी गहाळ मोबाईलचा शोध घेण्यासाठी डी. बी. पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार डी. बी. पथक व सायबर पोलीस ठाण्याने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे महाराष्ट्रासह इतर राज्यांतील मोबाईल धारकांशी सातत्याने संपर्क साधला. वारंवार पाठपुरावा आणि चिकाटीच्या प्रयत्नांमुळे हरविलेले 25 मोबाईल शोधण्यात यश आले. भविष्यातही अशाच प्रकारे हरविलेल्या मोबाईलचा शोध घेण्याची मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले यांनी दिली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक गहिणीनाथ सातव, पोलीस उपनिरीक्षक नितीन भोसले, पोलीस हवालदार तानाजी चव्हाण, उदय जाधव, जितेंद्र शिंदे, प्रकाश चव्हाण तसेच पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल काळे, प्रथमेश अलगुडे, प्रशांत गोरे, प्रतीक देशमुख, आशा देशमुख आणि सायबर पोलीस ठाणे, सातारा येथील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
Source link



