Ambabai Temple | अंबाबाईचे मुख्य शिखर आता सोन्याने लखलखणार

कोल्हापूर : गेल्याच महिन्यात माजीमुख्यमंत्री राणे हे करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला आले होते. त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन आपण अंबाबाईच्या मंदिराच्या मुख्य शिखरावर उभा करण्यासाठी सोन्याचा कळस देणार असल्याचे सांगितले होते. समितीच्या पदाधिकाऱ्यांनाही कळस देण्यास काही हरकत नसल्याचे राणेयांना सांगितले होते. त्यानुसार राणे यांनी तत्परतेने सोन्याचा कळस बनवून घेऊन तो करवीर निवासिनी अंबाबाईला अर्पण केला आहे.
हा कळस शुक्रवार या अंबाबाईच्या वाराचे औचित्य साधून पहाटे ३ ते ४ च्या सुमारास क्रेनने मंदिराच्या शिखरावर उभारण्यात आला आहे. शिखराजवळील बल्बच्या प्रकाशाने हा कळस अक्षरशः लखलखू लागला होता. देवीच्या दर्शनाला पहाटे पाचपासून येत राहिलेल्या स्थानिक व परगावच्या भाविकांना कळसाचा लखलखाट पहायला मिळाला. हा कळस आता शिखरावर कायमस्वरुपी असणार आहे.
दरम्यान, हा शोभेबंत कळस साकारण्यासाठी दीड किली सोन्याचा वापर केला आहे. हा कळस ६ फुट उंच आहे. त्याचा डेरा साडे सात फुटाचा आहे. आजच्या सराफ व्यवसायातील आजच्या बाजार भावानुसार कळसाचा किंमत तब्बल २ कोटी ५० लाख रुपयांहून अधिक आहे. गुरुवारी रात्री अंबाबाई मंदिराच्या गणपती चौकावरील शिखराचा मुळचा कळस काही काळासाठी काढून ठेवून त्याच्या जागी मंदिराच्या मुख्य शिखरावर बसवल्या जाणाऱ्या सोन्याचा कळस बसवण्याची ट्रायल घेण्यात आली. ही ट्रायल यशस्वी झाल्यानंतर पहाटे तीनच्या सुमारास हाच सोन्याचा कळस अंबाबाई मंदिराच्या मुख्य शिखरावर क्रेनच्या सहाय्याने उभा करण्यात आला. या कळसाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून अनेकांनी मंदिरात गर्दी केली होती.
मूळचा कळस वीस वर्षापूर्वीचा…
काही कारणात्सव अंबाबाई मंदिराच्या शिखरावरील कळस हा २० वर्षापूर्वी काढला होता. त्याच्या जागी तांबे या धातूपासून बनवलेला आणि सोन्याचा पत्रा लावलेला कळस बसवण्यात आला होता. गेली २ दशके हा कळस उन्ह, वारा, पाऊस सहन करत मंदिराच्या शिखराची शोभा वाढवत होता. आता या कळसाच्या जागी नवा सोन्याचा कळस बसवला आहे. त्यामुळे हा मुळचा कळस देवस्थान समिती आपल्या खजिन्यात जपून ठेवणार आहे, असेही नाईकवाडे यांनी सांगितले.
असा बनवला सोन्याचा कळस
मेंगलोरमधील एका सराफ कारागिराने हा कळस बनवला आहे. अंबाबाई मंदिरावरील मूळ कळसाच्या मापानुसार तब्बल २०० किलो तांबे या धातूपासून कळस तयार केला. यानंतर या कळसाला दीड किलो सोन्याचा पत्रा लावण्यात आला आहे. असा हा कळस बनवण्यासाठी दीड महिने सराफ कारागिराने परिश्रम घेतले आहेत.
मुहूर्त पाहून कळसात प्राणप्रतिष्ठापना करणार
सध्या अंबाबाई मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम सुरु आहे. हे काम पूर्णत्वाला गेल्यानंतरच ठराविक वेळेचा मुहूर्त पाहून शिखरावर उभा केलेल्या सोन्याच्या कळसात विधीवत प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे, असे समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.
Source link



