Grand Commencement of the BRICS Foreign Ministers’ Meeting

पंतप्रधान मोदी यांची सदस्य देशांशी व्यापक बोलणी
सध्याच्या परिस्थितीत परिषदेचे महत्व
- सध्याच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत ‘ब्रिक्स’चे महत्व अधिकच वाढणार
- भारत आणि रशिया यांच्यात परिषदेच्या निमित्ताने व्यापक द्विपक्षीय वाटाघाटी
- सध्याच्या परिस्थितीत सर्व ब्रिक्स देशांची एकात्मता अत्यंत महत्वपूर्ण ठरणार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
येथील ‘भारत मंडपम्’ येथे ‘ब्रिक्स’ देशांच्या परराष्ट्र मंत्री परिषदेला शानदार प्रारंभ झाला आहे. ही परिषद गुरुवारी आणि शुक्रवार अशी दोन दिवस चालणार आहे. सर्व ब्रिक्स देशांचे पराष्ट्र व्यवहार मंत्री या परिषदेला उपस्थित आहेत. विशेषत: रशियाचे विदेश मंत्री सर्गेई लाव्हरोव्हृ इराणचे अब्बास अराघची, दक्षिण अफ्रिकेचे रोनाल्ड लामोला, संयुक्त अरब अमिरातीचे शेख अब्दुल्ला बिन झायेद आणि ब्राझीलचे विदेश मंत्री माऊरो यांची उपस्थिती महत्वाची मानण्यात येत आहे.
या सर्व सदस्य देशांच्या मंत्र्यांचे दिल्लीत गुरुवारी भव्य स्वागत करण्यात आले. दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ही या परिषदेच्या स्थानी आले. त्यांनी सर्व विदेश मंत्र्यांशी द्विपक्षीय संबंध, आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे निर्माण झालेली आव्हाने आणि इतर महत्वाच्या विषयांवर चर्चा केली. या परिषदेसाठी आलेल्या मंत्र्यांनी एकमेकांमध्येही अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. भविष्यकाळात परिषदेची दिशा कशी आणि कोणती असेल, यावरही बरेच विचारमंथन झाल्याची माहिती दिली गेली.
भारत मंडपम्मध्ये स्वागत
सर्व परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचे परिषदेच्या स्थानी भारत मंडपम् येथे भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी स्वागत केले. त्यानंतर परिषदेच्या कामकाजाला औपचारिक प्रारंभ करण्यात आला. चीनने या परिषदेसाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांच्यास्थानी भारतातील चीनचे राजदूत जू फीहोंग यांना पाठविले आहे. सध्या अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप यांचा अमेरिकेचा दौरा होत असल्याने तेथे वांग यी यांची आवश्यकता आहे, असे कारण चीनकडून देण्यात आले आहे.
फीहोंग यांच्याशी चर्चा
सर्वप्रथम जयशंकर यांनी फीहोंग यांच्याशी चर्चा केली. ती सकारात्मक झाल्याचे दोन्ही देशांनी स्पष्ट केले. भारत आणि चीन यांच्या संबंधांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून अधिक जवळीक निर्माण झाली आहे. ही पुढेही रहावी, यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील आहेत. या चर्चेत या घनिष्टतेचे प्रतिबिंब उमटले होते.
भारत-रशिया मैत्री प्रगाढ
भारत आणि रशिया यांच्यात प्रगाढ मैत्री असल्याचेही या परिषदेत स्पष्टपणे दिसून आले. या परिषदेच्या निमित्ताने भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांच्यात सविस्तर चर्चा झाली. दोन्ही देशांमध्ये अनेक दशकांपासून घनिष्ट संबंध असून ते यापुढच्या काळात अधिक बळकट करण्याचा निर्धार चर्चेत व्यक्त करण्यात आला. ही बैठक हैद्राबाद हाऊस येथे पार पडली. ब्रिक्स परिषद भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री अतूट ठेवण्यासाठी नेहमीच मार्गदर्शक ठरत आली आहे. भविष्यकाळात दोन्ही देशांमध्ये भक्कम आर्थिक संबंध निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त केला गेला.
पंतप्रधान मोदी, लाव्हरोव्ह यांच्यात चर्चा
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांच्यात गुरुवारी ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने चर्चा झाली आहे. युक्रेन आणि भारत-रशिया संबंधांमधील विविध मुद्द्यांवर बोलणी करण्यात आली. कोणत्याही समस्येवर युद्धातून नाही, तर चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा काढता येतो, या मुद्द्यावर भारताने भर दिला. भारताची ही प्रारंभापासूनचीच नीती आहे. माझ्या शुभेच्छा आपण रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यापर्यंत पोहचवा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाव्हरोव्ह यांना केली. भारत आणि रशिया या दोन्ही देशांना सध्याच्या आव्हानात्मक आणि अस्थिर परिस्थितीत एकत्र येऊन एकमनाने कार्य करावे लागणार आहे. त्यादृष्टीने दोन्ही देशांनी आपली सज्जता केली पाहिजे, असेही या चर्चेत निर्धारीत केले गेल्याची माहिती देण्यात आली.
कोणत्या मुद्द्यांवर होणार चर्चा
सदस्य देशांमध्ये आर्थिक सहयोग, व्यापार, बहुपक्षीय सुधारणा, विकासाच्या मार्गातील आव्हाने, अलिकडच्या काळात निर्माण झालेली जागतिक परिस्थिती, ब्रिक्स परिषदेचे जागतिक आणि प्रादेशिक महत्व, आदी विषयांवर या बैठकीत महत्वपूर्ण चर्चा केली जाणार आहे. सध्याच्या अस्थिर जागतिक स्थितीत ब्रिक्ससारख्या परिषदेने कोणती भूमिका कशी साकारावी, याचे मार्गदर्शन या बैठकीतू मिळणार असून भारतासाठी ही परिषद अतिमहत्वाची आहे, हे स्पष्ट केले गेले.
Source link



