Uncategorized

टोल प्लाझावर आता रोख रकमेवर बंदी

10 एप्रिलपासून महामार्गाचे नियम बदलणार : युपीआय देखील 1.25 पट महाग होणार, ओळखपत्राशिवाय प्रवेशास मनाई

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

रस्ते वाहतूक मंत्रालयाने 10 एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझावर रोख पेमेंट पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता टोल भरण्यासाठी फास्टॅग हे प्राथमिक माध्यम असेल. वैध फास्टॅग नसलेले चालक युपीआय वापरून पैसे भरू शकतील, परंतु त्यांना निर्धारित टोल शुल्काच्या 1.25 पट शुल्क आकारले जाईल. टोल प्लाझावरील लांब रांगा कमी करणे हा या निर्णयाचा उद्देश आहे.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय 10 एप्रिलपासून देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर अधिक कठोर सुरक्षा आणि टोल वसुलीचे नियम लागू करत आहे. या बदलांचा मुख्य उद्देश सुरक्षित प्रवास सुनिश्चित करणे, वाहतूक कोंडी कमी करणे आणि बेकायदेशीर वाहतूक कारवायांना आळा घालणे हा आहे. नव्या नियमांनुसार आता महामार्गावरील प्रवास पूर्णपणे डिजिटल होणार आहे. 10 एप्रिलपासून टोल प्लाझावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही. प्रवाशांना फास्टॅग, युपीआय, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे टोल भरावा लागेल. जर वाहनाला फास्टॅग नसेल, तरीही चालक डिजिटल पद्धतीने पैसे भरू शकतो. परंतु राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांच्या नियम 14 नुसार अतिरिक्त शुल्क किंवा दंड भरावा लागणार आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आधार कार्ड अत्यावश्यक

नवीन नियमांनुसार, कोणताही टोल प्लाझा किंवा महामार्गावरील तपासणी नाका ओलांडण्यासाठी वाहनचालकांकडे आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना किंवा पासपोर्ट यांसारखे वैध सरकारी ओळखपत्र असणे आता अनिवार्य आहे. तपासणीदरम्यान तुम्ही तुमचा ओळख पुरावा सादर करू न शकल्यास, तुम्हाला केवळ मोठा दंडच भरावा लागणार नाही, तर पुढे जाण्यासही बंदी घातली जाईल. सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी आणि वाहनांची संशयास्पद हालचाल रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक हालचालीवर लक्ष

नवीन नियमावली आणि सुरक्षिततेला पुढील स्तरावर नेण्यासाठी, सरकारने टोल प्लाझा आणि प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही आणि स्वयंचलित नंबरप्लेट ओळख (एएनपीआर) प्रणाली तैनात केली आहे. महामार्ग गस्ती पथके वाहनांच्या योग्यता, विमा आणि प्रदूषण प्रमाणपत्रांची यादृच्छिक तपासणी देखील करतील. अपूर्ण कागदपत्रे असलेल्या वाहनांची ‘वाहन’ पोर्टलवर तात्काळ नोंद होणार असल्यामुळे भविष्यात योग्यता प्रमाणपत्र मिळवताना किंवा वाहन हस्तांतरित करताना अडचणी येऊ शकतात.

एनएचएआयने अलीकडेच आपल्या फास्टॅग वार्षिक पाससाठी 50 लाख ग्राहकांचा टप्पा ओलांडला आहे. या पासमुळे वापरकर्त्यांना 3,000 रुपयांमध्ये वर्षाला 200 टोल प्लाझांमधून जाण्याची परवानगी मिळते. ही योजना 15 ऑगस्ट रोजी सुरू झाल्यापासून या पासद्वारे एकूण 26.55 कोटी व्यवहार झाले आहेत. देशभरातील विविध राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर 1,150 हून अधिक टोल प्लाझा आहेत.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​