सावंतवाडी-बेळगाव महामार्गावर अपघात टाळण्यासाठी रंबलर बसवा; माडखोल ग्रामस्थांची मागणी

ओटवणे / प्रतिनिधी : सावंतवाडी-बेळगाव या आंतरराज्य महामार्गावरील माडखोल गावातील सापळेस्टॉप ते धवडकी परिसरात वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी आठ ठिकाणी रंबलर बसवावेत, अशी मागणी माडखोल ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रीय महामार्ग उपविभाग, सावंतवाडीचे शाखा अभियंता रुपेश कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
माडखोल गावातील फुगीवाडी आणि धवडकी परिसरात बाजारपेठ असल्याने येथे ग्रामस्थ, पादचारी तसेच वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. त्याचबरोबर गोवा, बेळगाव आणि कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचीही या महामार्गावर मोठी वर्दळ असते. वाहनांचा वेग अधिक असल्याने या परिसरात सातत्याने किरकोळ अपघात होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सुदैवाने आतापर्यंत या घटनांमध्ये जीवितहानी झालेली नाही.
शाळकरी मुलांना रस्ता ओलांडताना अडचण
महामार्गावरून भरधाव वाहने जात असल्याने पादचाऱ्यांसह शाळकरी मुलांनाही रस्ता ओलांडताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे अपघातांची शक्यता लक्षात घेऊन योग्य ठिकाणी रंबलर बसवून वाहनांचा वेग नियंत्रित करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
यावर शाखा अभियंता रुपेश कांबळे यांनी पावसाळा संपल्यानंतर माडखोल परिसरातील महामार्गावर रंबलर बसविण्याचे आश्वासन दिले.
गणेशोत्सवापूर्वी झाडी काढण्याची मागणी
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाढलेली झाडी आणि गवत तातडीने काढावे, तसेच आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक बसवावेत, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली. याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन अभियंता कांबळे यांनी दिले.
यावेळी उपसरपंच दत्ताराम कोळमेकर, माजी सरपंच संजय शिरसाट, माजी उपसरपंच सुरेश आडेलकर, शिवसेना ओबीसी सेलचे तालुकाप्रमुख वासुदेव होडावडेकर, जीवन केसरकर आणि लखन आडेलकर उपस्थित होते.
Source link



