शेखर सामंत यांना देवर्षी नारद पत्रकार पुरस्कार जाहीर

चिपळूण : प्रतिनिधी
विश्वसंवाद केंद्र मुंबई संस्थेतर्फे दिले जाणारे देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान पुरस्कार यावर्षी ‘तरुण भारत संवाद’च्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग आवृत्तीचे संपादक शेखर सामंत यांच्यासह कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यातील पाच पत्रकारांना जाहीर झाले आहेत. २ मे रोजी सायंकाळी ५ वाजता शहरातील डीबीजे महाविद्यालयाच्या सभागृहात हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.भारतीय मूल्ये, सत्यनिष्ठा आणि राष्ट्रहितासाठी समर्पित पत्रकारितेला प्रोत्साहन देणाऱया पत्रकारांना या पुरस्काराने गौरवण्यात येते. यंदा पुरस्काराची माहिती देवर्षी नारद पत्रकार सन्मान २०२६ चे संयोजक व विश्वसंवाद मुंबईचे स्ट्रटेजिक हेड डॉ. निशीथ भांडारकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. सामाजिक, संस्थात्मक आणि सातत्यपूर्ण कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे ‘तरुण भारत संवाद’चे सिंधुदुर्ग रत्नागिरी आवृत्तीचे संपादक शेखर सामंत यांनी दीर्घकाळापासून समाजाभिमुख कार्य करत अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. सडेतोड लेखनासाठी त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत संस्थेतर्फे त्यांना यावर्षी देवर्षी नारद पत्रकार सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
Source link



