प्रसंगी गोंधळ करणाऱ्या धोंडगणावरही कारवाई करा

जत्रोत्सवात कोणतीही हयगय खपवून घेणार नाही. : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे स्पष्ट आवाहन
डिचोली. प्रतिनिधी
शिरगाव येथील श्रीदेवी लईराईच्या जत्रोत्सवासाठी प्रशासकीय पातळीवर करण्यात आलेल्या सर्व तयारीची तालीम म्हणजेच मॉकड्रील घेण्यासाठी उपस्थित राहिलेल्या अधिक्रायांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अचानकपणे भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी सर्वांनी एकत्रित या जत्रोत्सवासाठी काम करताना मस्ती करून गोंधळ घालणाऱ्या भाविकांबरोबरच धोंडगणांनाही बाजूला काढण्यासाठी मागेपुढे पाहू नये. ही जबाबदारी सर्व पोलिसांची व प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही असून या जबाबदारीपासून कोणीही मागे हटवू नये, असे स्पष्ट आवाहन केले.
देवीला आपणही खूप मानतो. देवीला स्मरूनच आपण वरील आवाहन केले आहे. गेल्या वर्षी झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे निर्माण झालेली परिस्थिती व त्यामुळे गेले अनेक महिने सुरू असलेली या जत्रेची तयारी यावरून हा जत्रोत्सव कोणत्याही अडचणीशिवाय सुरळीत व सुरक्षित संपन्न व्हावा, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे. या अपेक्षेपणे देवीला स्मरूनच जत्रोत्सवात जर धोंडगणही मस्ती गोंधळ करून वाद, भांडण करीत असल्यास त्यांना बाहेर काढून ताब्यात घेण्यास मागे पुढे पाहू नये. शेवटी हा जत्रोत्सव सुरळीत व्हावा. हीच प्रत्येकाची अपेक्षा आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.
या जत्रोत्सवासाठी प्रशासकीय पातळीवरून मोठी तयारी करण्यात आली आहे. गेले अनेक दिवस अधिकारी दिवस-रात्र काम करीत असून विविध योजना आखलेल्या आहेत. त्या योजना अंमलात आणण्यासाठी केवळ संबंधित खात्याची जबाबदारी म्हणून बघ्याची भूमिका न घेता पोलिसांबरोबरच, आरोग्य खाते, अग्निशामक दल, उपजिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम खाते व इतर सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे जबाबदारीने काम करावे. तेव्हाच हा जत्रोत्सव सुरळीत व कोणत्याही अनुचित प्रकाराविना संपन्न होणार, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यावेळी म्हणाले.
यावेळी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव, उपजिल्हाधिकारी शुभम नाईक, पोलिस अधीक्षक हरिचंद्र मडकईकर व इतरांची उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोलिस, वाहतूक पोलिस, जिल्हाधिकारी, आरोग्य अधिकारी, अग्निशामक दल यांच्याकडून करण्यात आलेल्या तयारीची संपूर्ण माहिती जाणून घेतली. जत्रोत्सवात कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतीही हयगय आपण खपवून घेणार नाही. कोणत्याच अनुचित प्रकाराशिवाय ही जत्रा संपन्न व्हावी कोणत्याही प्रकारचे भांडण किंवा वाद या जत्रोत्सवात होऊ नये यासाठी प्रत्येकाने दक्ष रहावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
Source link


