आचरा येथे गणेश चतुर्थीनिमित्त 2,400 महिला मत्स्यव्यावसायिकांना कडधान्य वाटप; सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यावसायिक सहकारी संस्थेचा सलग १४ वा उपक्रम

आचरा / प्रतिनिधी : गणेश चतुर्थीच्या सणाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा महिला मत्स्यव्यावसायिक सहकारी संस्थेने सलग 14 व्या वर्षी जिल्ह्यातील महिला मत्स्यव्यावसायिक सभासदांसाठी कडधान्य वाटपाचा उपक्रम राबविला. ना-नफा, ना-तोटा या तत्त्वावर जिल्ह्यातील सुमारे 2,400 महिला सभासदांना विविध जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
आचरा विभागातील महिला मत्स्यव्यावसायिकांना कडधान्य वाटप करताना संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्नेहा केरकर, संस्थापक तथा गाबीत समाजाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, गौरी सारंग, सुमाली चोपडेकर, रंजना खराडे, आदित्य केरकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा केरकर यांनी सांगितले की, संस्थेच्या स्थापनेपासून गेल्या 14 वर्षांपासून गणेश चतुर्थीच्या सणानिमित्त गरजू व गरीब मच्छीमार महिलांना मदत करण्यासाठी हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. महिलांकडूनही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर्षी प्रत्येक महिला सभासदाला एकूण 10 किलो कडधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये पावटे, मूगडाळ, चणाडाळ, काळे वाटाणे, हिरवे वाटाणे, चणे, चवळी, गूळ, रवा आणि गोडेतेल यांचा समावेश होता.
किनारपट्टी भागातील कर्ली, पाट, परुळे, केळूस, देवबाग, तारकर्ली, वायरी, देवली, दांडी, धुरीवाडा, मालवण शहर, कोळंब, सर्जेकोट, तळाशील, तोंडवली, रेवंडी, आचरा आदी गावांतील सुमारे 2,400 महिला सभासदांना या उपक्रमाचा लाभ मिळाला.
महिलांच्या प्रश्नांसाठी संस्थेचा सातत्यपूर्ण लढा
यावेळी संस्थेचे संस्थापक चंद्रशेखर उपरकर यांनी संस्थेच्या अध्यक्षा स्नेहा केरकर आणि त्यांच्या सहकारी सभासदांच्या कार्याचे कौतुक केले. गेल्या 14 वर्षांत महिला मत्स्यव्यावसायिकांच्या व्यवसायातील अडचणी दूर करण्यासाठी, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच मासे विक्रीच्या ठिकाणी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
मच्छीमार्केट व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि मच्छीमारांची घरे त्यांच्या नावावर करण्यासह विविध मागण्यांसाठी मालवण, देवगड आणि वेंगुर्ले येथे महिला मत्स्यव्यावसायिकांचे मोर्चे काढण्यात आल्याचे उपरकर यांनी नमूद केले.
मत्स्य दुष्काळाच्या काळात शासनाकडून मिळणारे 6 हजार रुपयांचे अनुदान महिला मत्स्यव्यावसायिकांना मिळावे यासाठी धरणे आंदोलन व आक्रोश मोर्चा काढून सुमारे 1,500 महिलांना न्याय मिळवून दिल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मत्स्य संपदा योजनेअंतर्गत 75 टक्के अनुदानातून सुमारे 50 महिलांना घरपोच मासे विक्रीसाठी ई-स्कुटर उपलब्ध करून देत रोजगाराची संधी निर्माण करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राज्य शासनाच्या मत्स्य संपदा योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या 5 हजार रुपयांच्या नि:शुल्क अपघाती विमा योजनेचा महिला मत्स्यव्यावसायिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. गणेश चतुर्थीनंतर मत्स्य अधिकाऱ्यांच्या सहकार्याने महिलांची विमा योजनेसाठी नोंदणी करण्यात येणार असून, जिल्ह्यातील इच्छुक महिलांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन चंद्रशेखर उपरकर यांनी केले.
Source link



