हलगर्जीपणाचा कळस! मीठ मागिल्यानंतर दिलं डिटर्जंट; बिहारमध्ये 34 विद्यार्थी रुग्णालयात दाखल

नालंदा : बिहारच्या नालंदा जिल्ह्यात शालेय पोषण आहाराच्या व्यवस्थेला हादरा देणारी घटना समोर आली आहे. नूरसराय प्रखंडातील परासी येथील सरकारी मिडल स्कूलमध्ये मंगळवारी मिड-डे मील खाल्ल्यानंतर 34 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. विद्यार्थ्यांनी जेवणासोबत अतिरिक्त मीठ मागितल्यानंतर स्वयंपाकी महिलेने चुकून मिठाऐवजी डिटर्जंट पावडर दिल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांना बिहारशरीफ सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले.
132 विद्यार्थ्यांना जेवण; 34 जणांची प्रकृती बिघडली
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सुमारे 12.30 वाजता शाळेतील 132 विद्यार्थ्यांना मिड-डे मील देण्यात आले. यामध्ये भात आणि सोयाबीन-आलूची भाजी होती. जेवण झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार केली. त्यानंतर एकूण 34 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये 17 मुले आणि 17 मुलींचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांना घसा आणि पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यानंतर शाळा व्यवस्थापनाने तातडीने त्यांना उपचारासाठी नेले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना बिहारशरीफ सदर रुग्णालयात हलवण्यात आले.
विद्यार्थिनीने मागितले मीठ अन् घडला प्रकार
शाळेचे मुख्याध्यापक शैलेंद्र कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेत मिड-डे मील टप्प्याटप्प्याने वाढले जात होते. दुसऱ्या टप्प्यात एका विद्यार्थिनीने जेवणासोबत अतिरिक्त मीठ मागितले.
ही विद्यार्थिनी शाळेतील एका स्वयंपाकी महिलेची नात असल्याचे सांगण्यात येत आहे. विद्यार्थिनीला अतिरिक्त मीठ देताना स्वयंपाकी महिलेने चुकून मिठाऐवजी डिटर्जंट पावडर उचलली आणि ती जेवणात मिसळली. इतर विद्यार्थ्यांनीही ही बाब पाहून अतिरिक्त मीठ मागितले. त्यांनाही त्याच डिटर्जंट पावडरचा वापर करून देण्यात आल्याचे सांगण्यात येते.
काही वेळातच विद्यार्थ्यांनी घसा आणि पोटात दुखत असल्याची तक्रार सुरू केली. त्यानंतर शाळा व्यवस्थापनाच्या लक्षात ही गंभीर चूक आली.
शाळेतील शिक्षकांनी जेवण चाखले होते
विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना भोजन देण्यापूर्वी शाळेतील दोन स्वयंपाकी आणि दोन शिक्षकांनी स्वतः जेवण चाखले होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यानंतर दुपारी विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आले.
मिड-डे मीलचा पुरवठा एकता शक्ति फाउंडेशनच्या नगरनौसा येथील रामघाट केंद्रीय स्वयंपाकघरातून केला जातो. या केंद्रीय स्वयंपाकघरातून चंडी, नगरनौसा आणि नूरसराय प्रखंडांतील 206 शाळांमधील सुमारे 23,000 विद्यार्थ्यांसाठी दररोज भोजन पाठवले जाते.
अन्नाचे नमुने तपासले जाणार
घटनेची माहिती मिळताच शिक्षण विभाग आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी रुग्णालयात पोहोचले. बिहारचे मंत्री श्रवण कुमार यांनीही रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या उपचाराबाबत डॉक्टरांकडून माहिती घेतली.
जिल्हा प्रशासनाने मिड-डे मीलचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याचे सांगितले आहे. डॉक्टरांच्या तपासणीनुसार सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे आणि सध्या कोणालाही गंभीर धोका नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
मिड-डे मीलच्या निगराणीवर गंभीर प्रश्न
मिड-डे मीलसारख्या महत्त्वाच्या योजनेत भोजनाची गुणवत्ता आणि वितरण प्रक्रियेवर नियमित देखरेख असणे अपेक्षित आहे. मात्र, मिठाऐवजी डिटर्जंट विद्यार्थ्यांच्या जेवणात जाण्याच्या या घटनेमुळे शाळेतील भोजन व्यवस्था, स्वयंपाकघरातील साहित्याची हाताळणी आणि प्रशासनाच्या निगराणीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, या प्रकरणात अद्याप FIR किंवा अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अन्नाच्या नमुन्यांच्या तपासणीनंतर आणि चौकशीनंतर या प्रकरणातील नेमकी जबाबदारी निश्चित होण्याची शक्यता आहे.
Source link



