एलपीजी गॅस बुकिंगची ४५ दिवसांची अट रद्द करा !

बांदा / प्रतिनिधी : सध्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगसाठी लागू असलेली ४५ दिवसांची कालमर्यादा सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत त्रासादायक ठरत आहे. आगामी श्रावण महिना आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही अट शिथिल करून नागरिकांना मोठा दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, ग्रामीण व शहरी भागातील अनेक कुटुंबांकडे एकच सिलिंडर असते. गॅस संपल्यानंतर पुढील बुकिंगसाठी तब्बल ४५ दिवस वाट पाहावी लागत असल्याने गृहिणींची मोठी अडचण होत आहे. श्रावण आणि गणेशोत्सवात पाहुणचार, नैवेद्य व विविध धार्मिक विधींमुळे गॅसचा वापर वाढतो. अशा वेळी वेळेवर गॅस न मिळाल्यास नागरिकांना लाकूड किंवा कोळशाचा आधार घ्यावा लागत असून, यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिकावर शारीरिक व आर्थिक ताण पडत आहे.
घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगची ४५ दिवसांची अट तातडीने कमी करून ती पूर्वीप्रमाणे १५ ते २१ दिवसांवर आणावी. श्रावण आणि गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना गरजेनुसार वेळेवर सिलिंडर उपलब्ध करून द्यावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व गॅस वितरकांकडे पुरेसा गॅस साठा उपलब्ध राहील याकडे लक्ष द्यावे. या मर्यादेचा गैरफायदा घेऊन अतिरिक्त दर आकारणे, काळाबाजार करणे अथवा कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील गॅस वितरण व्यवस्था अधिक सुरळीत करावी.
”गॅस बुकिंगच्या या अटीमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक शोषणाला बळी पडत असून काळाबाजाराला खतपाणी मिळत आहे. जिल्हा प्रशासनाने गॅस कंपन्यांशी समन्वय साधून यावर त्वरित तोडगा काढावा,” अशी मागणी माजी उपसरपंच तथा बांदा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांनी केली आहे. यावेळी जावेद खतीब, माजी उपसरपंच बाळू सावंत, युवा मोर्चाचे अध्यक्ष सिद्धेश कांबळी, योगेश देसाई आदी उपस्थित होते.
Source link



