Shahuwadi Water Crisis | शाहूवाडी तालुक्यात ‘पाणीबाणी’! ३ प्रमुख नद्यांची पात्रे पूर्णपणे कोरडी; पिके वाचवण्यासाठी बळीराजाची धडपड

शाहूवाडी ( संतोष कुंभार ) – रोहिणी नक्षत्रात झालेल्या पेरणीनंतर मृग नक्षत्राच्या आगमनाची शेतकरी आतुरतेने बाट पाहत होते. पावसाच्या आशेवर उगवलेली पिके आणि तरवे आता पाण्याअभावी कोमेजू लागल्याने शाहूवाडी तालुक्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. जून महिना अर्ध्यावर आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने पिके जगविण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.
कडवी, पालेश्वर, गेळवडे आणि मानोली धरणांच्या पाणीसाठ्यावर तालुक्यातील मोठ्या प्रमाणातील शेती अवलंबून आहे. या धरणांमुळे परिसरातील शेतीला आधार मिळत असला तरी यंदाच्या विलंबित पावसामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.
शेतकऱ्यांनी केलेल्या पेरण्या आता पाण्याअभावी धोक्यात आल्या असून पिके वाचविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे.
शाळी, कडवी आणि अंबार्डी या नद्यांची पात्रे पूर्णपणे कोरडी पडली आहेत. जूनच्या मध्यावरही नदीपात्रांमध्ये पाण्याचा थेंब नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोरड्या नदीकाठांमुळे ग्रामीण भागात चिंतेचेबाताबरण निर्माण झाले आहे.
सध्या कडवी धरणात २१.६० दलघमी तर पालेश्वर धरणात १०३.४० दलघमी पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. भविष्यातील पिण्याच्या पाण्याच्या गरजा लक्षात घेऊन जलसाठ्याचे नियोजन करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
Source link



