महावितरणच्या नोटिसची होळी करा – Tarun Bharat

वीज ग्राहक संघर्ष समितीचे आवाहन…
सावंतवाडी : प्रतिनिधी
राज्यात सगळीकडे ग्राहकांचा विरोध असताना महावितरणने ४८ तासात स्मार्ट मीटर बसून घेण्याची नोटीस काढली आहे. आम्ही जाहीर याचा निषेध करतो. या नोटीसची महावितरणच्या कार्यालयासमोर एकत्र जमून वीज ग्राहकांनी राज्यभर होळी करावी असे आव्हान वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने निमंत्रक कॉम्रेड संपत देसाई व राजेंद्र कांबळे यांनी केले आहे.दिनांक ५ फेब्रुवारी २०२५ रोजी गडहिंग्लज जिल्हा कोल्हापूर या महावितरणच्या कार्यालयावर आणि कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथील अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयावर १० फेब्रुवारी २०२५ रोजी वीज ग्राहकांचा प्रचंड मोर्चा निघाला होता. यावेळी कार्यकारी अभियंता गडहिंग्लज आणि अधीक्षक अभियंता कुडाळ यांनी ग्राहकाच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवले जाणार नाही त्याचबरोबर स्मार्ट मीटरच्या संदर्भात वरिष्ठांच्या सोबत संघटनेची बैठक होऊन निर्णय होईपर्यंत कोणत्याही ग्राहकाचे आत्ता चालू असलेले मीटर बदलले जाणार नाही असे लेखी पत्र दिले आहे. असे असताना स्वतः महावितरणचे कर्मचारी खाजगी कंपनीचे स्मार्ट मीटर कसे काय बसवत आहेत असा आमचा प्रश्न आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने करून जनतेने आपला विरोध दर्शवला आहे. तरीही महावितरण आता खाजगी कंपन्यांचे दलाल बनून स्मार्ट मीटर बसवण्यासाठी पुढाकार घेत आहे हे अत्यंत वाईट आहे. त्यामुळे महावितरणच्या या नोटीसची सर्वत्र होळी करून वीज ग्राहकांनी आपला निषेध नोंदवावा आणि आपला विरोध कायम ठेवावा. असे आवाहन आम्ही वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने करीत आहोत.
Source link



