ब्रह्मसुखाच्या गोडीने योग्याला विषयवासनेची आठवण देखील येत नाही

भगवंत म्हणाले, योगाभ्यासामुळे विषयांच्या चिंतनातून मुक्त होऊन, चित्त आत्मस्वरूपाचे चिंतन करू लागले की, योग्याला त्याच्यातील आत्म्याची भेट घडते व तो संतुष्ट होतो. स्वस्वरूपाची ओळख पटणे हे सुख सर्वोत्कृष्ट आहे. ह्याची कल्पना इंद्रिये करू शकत नाहीत कारण त्या सुखाचे आकलन होणे इंद्रियांच्या कुवतीच्या बाहेरचे आहे. हे सुख प्राप्त झालेला योगी त्याच्यावर दु:खाचा डोंगर जरी कोसळला तरी डगमगत नाही. दु:खाचा संपूर्ण अभाव असलेल्या सुखाला योग असे म्हणतात.
पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, दु:खाचा संपूर्ण अभाव असलेल्या सुखाला योग असे म्हणतात. निश्चयपूर्वक व उत्साहाने योगाचे अनुष्ठान करावे.
तयास म्हणती योग दु:खाचा जो वियोग चि । जोडावा निश्चयाने तो योग उत्साह राखुनी ।।23 ।। श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, ब्रह्मसुखाची चटक लागण्यापूर्वी मन संसाराच्या मोहात गुंतलेले असते पण आता ब्रह्मसुखाच्या गोडीने त्याला विषयवासनेची आठवण देखील येत नाही. असे सुख योग्याला सौभाग्याने मिळते. त्याचा आनंद घेताना तो स्वत:च सुखरूप होऊन जातो. निश्चयपूर्वक व सोत्साह अंत:करणाने युक्त होऊन योगाचे अनुष्ठान करावे. ब्रह्मसुखाची चटक लागण्यापूर्वी मन संसाराच्या मोहात गुंतलेले असते पण आता ब्रह्मसुखाच्या गोडीने त्याला विषयवासनेची आठवण देखील येत नाही. सौभाग्याने मिळालेल्या सुखाचा आनंद घेताना तो स्वत:च ते सुख होऊन जातो.
पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, सौभाग्याने मिळालेल्या सुखाचा आनंद घेण्यासाठी तो कर्म करताना कोणतेही संकल्प करत नाही. त्यामुळे तो पूर्ण झाल्यावर अमुक इच्छा पूर्ण होतील असा विचार त्याच्या मनात येत नसल्याने त्याला इंद्रियांचे नियमन करणे शक्य होते.
संकल्पी उठिले सारे काम नि:शेष सोडुनी। इंद्रिये ही मनाने चि ओढुनि विषयातुनी ।। 24 ।।
कोणतेही कर्म करण्याचा संकल्प केला की, ते कार्य केल्यामुळे अमुक एक इच्छा पूर्ण व्हावी अशी अपेक्षा असते. त्यानुसार माणसाची एक इच्छा पूर्ण झाली की, ज्ञानेंद्रिये त्याला आणखीन काही मिळवण्यासाठी त्याने प्रयत्न करावेत ह्यासाठी निरनिराळी आकर्षणे दाखवत असतात. त्यातून पुढल्या इच्छेचा उदय होतो. ह्या दुष्टचक्राला अंत म्हणून माहित नसतो. त्यामुळे त्याच्या जीवाला स्वस्थता अशी नसते. योग्याला मात्र कर्तव्य करताना त्यातून अमुक एक फळ मिळावे अशी इच्छा नसल्याने त्याची ज्ञानेंद्रिये त्याला निरनिराळी आकर्षणे दाखवून भुलवू शकत नाहीत. त्यांच्यावर ताबा मिळवून तो त्यांचे नियमन करतो आणि त्याला हवी असेल तेव्हढीच माहिती त्यांच्याकडून मिळवतो. म्हणून कायम सुखी राहण्यासाठी कर्म करत असताना कोणत्याही फळाची अपेक्षा न करणे ही पहिली पायरी आहे.
माउली श्लोकाच्या विवरणात म्हणतात, भगवंताच्या सांगण्यानुसार सोप्या पद्धतीने इंद्रियांच्यावर ताबा मिळवायचा असेल तर माणसाने इच्छाच नाहीशा कराव्यात. सामान्य मनुष्य इंद्रियांच्या ताब्यात असतो परंतु निरिच्छ माणसाची इंद्रिये त्याच्या ताब्यात असल्याने तो कोणतेही संकल्प न करता कार्य करत असतो. अमुक एक हवं किंवा अमुक एक नको असं वाटायचं बंद झालं की माणसाला वैराग्य येते. हे वैराग्य एकदा आले की संकल्पाचे कंबरडेच मोडते.
क्रमश:
Source link



