Ratnagiri News | रत्नागिरीतील अंबुवाडी समुद्रकिनारी कासवांच्या पिल्लांना मिळाले जीवदान

कासव संवर्धनासाठी नांदिवडे गाव सरसावले
रत्नागिरी – रत्नागिरी तालुक्यातील नांदिवडे गावातील अंबुवाडी (आंबू) समुद्रकिनारा हा त्याच्या शांततेसाठी आणि सुरक्षित सपाटीकरणामुळे प्रसिद्ध आहे. यामुळे वर्षानुवर्षे समुद्री कासवांचे आवडते प्रजनन स्थळ ठरत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही किनाऱ्यावर कासवांची अनेक घरटी पाहायला मिळत आहेत. मात्र, याच किनाऱ्यावर अंड्यातून बाहेर पडलेली कासवाची पिल्ले समुद्राकडे जात असताना वाळूमध्ये अडकून पडल्याची घटना नुकतीच समोर आली.
समुद्रकिनाऱ्यावर ही चिमुकली पिल्ले वाळूवर अडकून पडल्याचे सामाजिक कार्यकर्ते सागर सुर्वे यांच्या निदर्शनास आले. किनाऱ्यावर वावरणारे भटके कुत्रे आणि आकाशात घिरट्या घालणारे शिकारी पक्षी (घार) यांच्यापासून या पिल्लांना मोठा धोका होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सागर सुर्वे यांनी तत्परता दाखवली आणि या सर्व पिल्लांना सुरक्षितरित्या एकत्र जमा करून समुद्राच्या पाण्यात सोडले.
सागर सुर्वे यांच्या या समयसूचकतेमुळे या कासवाच्या पिल्लांना जीवदान मिळाले असून, निसर्गप्रेमींकडून त्यांचे कौतुक होत आहे. कासवांच्या संवर्धनासाठी अशा प्रकारे स्थानिक नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
Source link

