अध्याय सातवा सारांश भाग एक

ह्या अध्यायाचे नाव ज्ञानविज्ञानयोग असे आहे. भगवंत म्हणाले, ज्ञान आणि विज्ञान ह्या दोन गोष्टी नीट समजून घेतल्यास अन्य काही जाणायचे शिल्लक रहात नाही. अर्थात लक्षावधीत एखादाच हे जाणून मोक्ष मिळवण्यासाठी झटत असतो आणि अशा लाख माणसांपैकी एखाद्यालाच माझे ज्ञान होऊन मोक्ष मिळतो.
प्रथम माझ्या प्रपंचाबद्दल म्हणजे अखिल विश्वाबद्दल सांगतो. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंच महाभूते आणि मन, बुद्धी, अहंकार ह्या आठ घटकांनी हे विश्व म्हणजे माझा प्रपंच तयार होतो. हे सर्व माझ्या अपरा म्हणजे दिसणाऱ्या मायेच्या सहाय्याने मी तयार करतो तर माझी न दिसणाऱ्या म्हणजे परामायेने मी जीव तयार करतो. ह्या जगाच्या निर्मितीला आणि नाशाला मीच कारणीभूत आहे. ह्या पलीकडे काही नसल्याने मी निर्माण केलेल्या सर्व सजीव आणि निर्जीव गोष्टी धाग्यात मणी ओवल्याप्रमाणे माझ्यात गुंफलेले आहेत. पाण्यामध्ये मी रस होऊन वावरत असतो तर चंद्र, सूर्यांचा प्रकाश माझ्यामुळेच आहे. आकाशात उमटणारा ओंकार आणि पुरुषातला पुरुषार्थ मीच आहे. पृथ्वीला येणारा पुण्यगंध, अग्नीतील उष्णता, प्राणीमात्रात आयुष्य, तप करणाऱ्यांचे तप, सर्व भूतातील बीज, बुद्धिमंतातील बुद्धी, तेजस्व्यातील तेज, वैराग्ययुक्त, निरपेक्ष माणसांच्यातील आत्मिक बल, धर्माला धरून भूतात असलेली वासना मीच आहे. भुतांच्या स्वभावातील सात्विकदिक भाव माझ्यातूनच तयार झालेले आहेत परंतु ते भाव म्हणजे मी नव्हे.
त्रिगुणांनी विश्वाला मोहून टाकले आहे आणि मी त्या त्रिगुणांच्या पलीकडे असल्याने मला सहजी जाणून घेणे शक्य होत नाही. स्वत:च्या बळावर भवसागर पार करून माझ्यापर्यंत येणे शक्य नाही पण जे माझ्या भजनी लागतात ते मात्र हा भवसागर सहजी पार करून मला येऊन मिळतात. हीन, मूढ, दुराचारी असलेले नास्तिक माझा आश्रय सोडतात आणि मायेच्या प्रभावाखाली येऊन आसुरी भाव जोडतात.
पुढे भगवंत म्हणतात, माझ्या आश्रयाला येणारे भक्त सदाचारी असतात. त्यांचे ज्ञानी, जिज्ञासू, हितार्थी आणि व्हीव्हल असे चार प्रकार पडतात. त्यातील ज्ञानी सगळ्यात वरिष्ट असून तो माझ्याशी अनन्य भक्तीने नित्य जोडलेला असतो. त्याचे माझ्यावर अत्यंत प्रेम असते आणि मीही त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असतो. माझ्यावरील अनन्य भक्तीमुळे तो आणि मी दिसायला वेगवेगळे असलो तरी मनाने एकरूप झालेलो असतो. काहीतरी प्राप्त करून घ्यावे ह्या उद्देशाने माझ्या भक्तीला सुरवात होते. हळूहळू भक्ताच्या हे लक्षात येऊ लागते की, हवी असलेली फळे मी त्यांना देत असलो तरी ही फळे कायम टिकणारी नाहीत. मग ते माझ्यावरील प्रेमापोटी कोणतीही अ पेक्षा न ठेवता माझी भक्ती करू लागतात. ह्या प्रमाणे अनेक जन्माच्या भक्तीसाधनेतून ज्ञानी भक्त मला अनन्य शरण आलेला असतो. त्यामुळे त्याला माझे विश्वव्यापी रूप लक्षात येते. जिज्ञासू भक्ताला माझ्याबद्दल जाणायची उत्सुकता असते. हितार्थी भक्ताला भक्तीच्या बदल्यात माझ्याकडून अपेक्षा असतात तर व्हिव्हल भक्ताला त्याच्या दुखण्यातून मुक्ती हवी असते.
Source link



