जिल्हाधिकाऱ्यांच्या पाहणीच्या आठवडाभरातच आंबोलीत पर्यटकाचा मृत्यू

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी : जिल्ह्यातील प्रसिद्ध आंबोली मुख्य धबधब्यावर कर्नाटकातील ३८ वर्षीय पर्यटकाचा सर्पदंशामुळे झालेला मृत्यू ही अत्यंत वेदनादायी घटना असून, या घटनेस बेजबाबदार प्रशासन जबाबदार असल्याचा गंभीर आरोप सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी केला आहे. पर्यटकांकडून शुल्क आकारले जात असेल, तर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही प्रशासनाने स्वीकारली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
विशेष म्हणजे, घटनेच्या अवघ्या आठवडाभरापूर्वी जिल्हाधिकारी आंबोली येथे जाऊन स्वच्छता आणि सुरक्षेबाबत पाहणी करून प्रशासनाला आव्हानात्मक सूचना देत होत्या. त्या पाहणीचे फोटोसेशन आणि व्हिडिओसेशन केवळ प्रशासकीय बातम्यांपुरतेच होते का? प्रत्यक्ष पर्यटनस्थळी सुरक्षा व्यवस्था कितपत सक्षम आहे, याची जबाबदारी प्रशासन घेणार आहे का? असे सवाल मोंडकर यांनी उपस्थित केले.
आंबोली धबधब्यावर झालेल्या या दुर्दैवी मृत्यूची नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी स्वीकारून मृत पर्यटकाच्या कुटुंबीयांना शासनाने ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मोंडकर यांनी केली. पर्यटकांकडून आकारण्यात येणाऱ्या २० रुपयांच्या पावतीवर ‘उपद्रव शुल्क’ असा उल्लेख करण्यात आला असल्याबद्दलही मोंडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Source link



