Ashadhi Ekadashi 2026 तुकोबांच्या पालखीचे भक्तीच्या वर्षावात प्रस्थान

त. भा. प्रतिनिधी पिंपरी
होय होय वारकरी ।
पाहे पाहे रे पंढरी ।।
हा विठुरायाच्या भेटीचा आर्त भाव…‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा जयघोष.. टाळ-मृदंगाचा गजर…अन् वरुणराजाचा जलाभिषेक….अशा विठ्ठलमय वातावरणात व भक्तीच्या वर्षावात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने मंगळवारी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. इंद्रायणी नदीच्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देऊळवाड्यात मोठी गर्दी होऊ नये म्हणून मोजक्मयाच मानकरी, सेवेकरी आणि वारकऱ्यांच्या मर्यादित उपस्थितीत अतिशय शिस्तबद्ध आणि सुरक्षितपणे यंदा प्रस्थान सोहळा पार पडला.
प्रस्थानाचा सोहळा हा वारकऱ्यांसाठी जणू दसरा, दिवाळीहून मोठा आनंदाचा सण. हा सोहळा ‘याचि देही याची डोळा’ साठवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील लाखो वारकऱ्यांची पावले देहूनगरीकडे वळत असतात. यंदा मात्र अतिवृष्टी व इंद्रायणीच्या पुरामुळे अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे मर्यादित वारकरी व भाविकांच्या उपस्थितीत प्रस्थान सोहळा रंगला. या सोहळ्याने इंद्रायणीच्या पाण्यातही आनंदाचे तरंग उमटले.
पहाटे पाच वाजता श्री महापूजा व शिळामंदिर महापूजा विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख यांच्या हस्ते पूजा झाली. पहाटे साडेपाच वाजता पालखी सोहळा जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी महापूजा, तर सकाळी नऊ ते दहादरम्यान श्री तुकोबाराय पादुका महापूजा (इनामदार वाडा), तर दुपारी दहा ते बारादरम्यान पालखी प्रस्थान सोहळा सप्ताह काला कीर्तन झाले.
त्यानंतर दुपारी अडीच वाजता मुख्य पादुका महापूजा व प्रस्थान सोहळ्याला भक्तिमय वातावरणात सुऊवात करण्यात आली. याच सुमारास इनामदार वाड्यातून महाराजांच्या पादुका देऊळवाड्यातील भजनी मंडपात आल्या. त्यानंतर दिंड्यांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंत्रघोषात पादुकापूजन करण्यात आले. दुपारी ठीक 4 वाजून 2 मिनिटांनी तुकोबारायांच्या पालखीने विठ्ठल भेटीसाठी पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले. या वेळी वऊणराजानेदेखील जलाभिषेक करीत सोहळ्याचे स्वागत केले.
प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीस येऊ नये
आळंदीत मंगळवारी पावसाचा ओघ कमी झाल्याने पुराची तीव्रता काहीशी कमी झाली. मात्र, आळंदीतील पूल पाण्याखालीच असल्याचे दिसून आले. इंद्रायणीचा पूर अद्यापही कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व वारकरी आणि भाविकांनी पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीस येऊ नये, असे नम्र आवाहन संस्थान कमिटीने केले आहे. हवामान आणि नैसर्गिक परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील मुक्कामापासून वारीत सहभागी होण्यासंदर्भात संस्थानकडून सूचना करण्यात आलेल्या आहेत.
देहू, : माझ्या जीविची आवडी । पंढरपुरा नेईन गुढी ।। असा भाव मनी बाळगत संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने देहूहून आळंदीकडे मंगळवारी प्रस्थान ठेवले.
Source link



