…तर कोलकात्यालाही निशाणा बनवण्यास सज्ज

पाकिस्तानी संरक्षणमंत्र्यांचा भारताला इशारा : राजनाथ सिंह यांच्या वक्तव्यामुळे ख्वाजा आसिफ संतप्त
वृत्तसंस्था/ लाहोर
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला निशाणा बनवण्याचा इशारा दिला आहे. लाहोरपासून सुमारे 130 किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या मूळ गावी सियालकोट येथे पत्रकारांशी बोलताना आसिफ यांनी ‘भविष्यात कोणत्याही कुरापतीला कोलकातापर्यंत हल्ल्यांनी प्रत्युत्तर दिले जाईल,’ अशी धमकी दिली आहे.
भारताने पाकिस्तानवर दोषारोप करून लष्करी कारवाई करण्याचा प्रयत्न केला, तर पाकिस्तान कोलकाता शहरालाही लक्ष्य करेल, असे आसिफ म्हणाले. भारतीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर म्हणून ख्वाजा आसिफ यांनी हा इशारा दिला आहे. राजनाथ सिंह यांनी नुकत्याच एका नौदल कार्यक्रमात बोलताना सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही कुरापतीला भारताचे प्रत्युत्तर अभूतपूर्व आणि निर्णायक असेल असे म्हटले होते. गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानला 22 मिनिटांत गुडघे टेकायला लावल्याची आठवणही त्यांनी करून दिली होती.
पाकिस्तानची यापूर्वीही धमकी
पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याची धमकी देण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी, पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी अब्दुल बासित यांनी ‘जर अमेरिकेने कधी पाकिस्तानवर हल्ला केला किंवा त्यांच्या अणुकार्यक्रमाला लक्ष्य केले, तर पाकिस्तानकडे भारतावर हल्ला करण्याशिवाय पर्याय राहणार नाही’, असे म्हटले होते. तसेच त्यांनी दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांना लक्ष्य करण्याबद्दलही भाष्य केले होते. गेल्यावर्षी 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यामुळे दोन्ही देशांमध्ये चार दिवसांचा संघर्ष झाला. या काळात भारताने पाकिस्तानमध्ये 100 किलोमीटर आत घुसून हल्ला करताना अनेक दहशतवाद्यांना ठार केले होते. या हल्ल्याच्या माध्यमातून भारताने आपली ताकद दाखवून दिली होती.
Source link



