Uncategorized

आसाम, केरळ, पुद्दुचेरीमध्ये आज विधानसभेसाठी मतदान

296 जागांसाठी लढत : 1,906 उमेदवार रिंगणात : निवडणूक आयोगाकडून तयारी पूर्ण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आसाममधील 126, केरळमधील 140 आणि केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमधील 30 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचे भवितव्य आज गुरुवारी ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. या सर्व जागांसाठी गुरुवारी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीमधील विधानसभा निवडणुकीसाठीचा जोरदार प्रचार मंगळवारी संध्याकाळी थांबला. त्यानंतर आयोगाने केलेल्या आखणीनुसार निवडणूक प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान झाल्यानंतर 4 मे रोजी मतमोजणी होईल आणि त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. आता सर्वांचे लक्ष मतदानाच्या टक्केवारीवर आणि निवडणुकीच्या निकालांवर लागले आहे. सर्व मतदान केंद्रांवर मतदान कर्मचारी दाखल झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

आसाममधील 126, केरळमधील 140 आणि पुदुचेरीमधील 30 जागांसाठी गुरुवारी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. आसाम विधानसभेच्या 126 जागांसाठी 722 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. बहुमताचा आकडा 64 आहे. राज्याच्या 15 व्या विधानसभेचा कार्यकाळ 20 मे 2026 रोजी संपत आहे. आसाममध्ये एकूण 2.5 कोटी मतदार आहेत, त्यात जवळपास 1.25 कोटी पुरुष, 1.25 कोटी महिला आणि 343 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. 18-19 वयोगटातील 5.75 लाख तरुण प्रथमच आपला मतदानाचा हक्क बजावतील.

केरळमध्ये 140 जागांसाठी 890 उमेदवार

केरळ विधानसभेच्या 140 जागांसाठी 890 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ही लढत प्रमुख राजकीय पक्षांमध्ये तिरंगी आहे. सरकार स्थापन करण्यासाठी 71 जागांचे बहुमत आवश्यक आहे. राज्यात एकूण 2.71 कोटी मतदार असून, त्यामध्ये 1.32 कोटी पुरुष, 1.39 कोटी महिला आणि 273 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.

दरम्यान, पुद्दुचेरी विधानसभेच्या 30 जागांसाठी 294 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. पुद्दुचेरीमध्ये 30 जागांवर निवडणूक लढवली जात असून त्यामध्ये अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या पाच जागांचा समावेश आहे. सरकार स्थापन करण्यासाठी 16 जागांचे बहुमत आवश्यक आहे. येथे एकूण 9.44 लाख मतदार असून त्यामध्ये अंदाजे 4.43 लाख पुरुष, 5 लाख महिला आणि 139 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. येथे भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए पुन्हा सत्तेत येण्याची आशा बाळगून आहे, तर विरोधी आघाडी आणखी एका विजयासाठी आतुर आहे.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, नामनिर्देशन प्रक्रियेदरम्यान मोठ्या संख्येने उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. आसाममध्ये 817 उमेदवारांचे प्रतिनिधित्व करणारे 1,388 अर्ज नोंदवले गेले. केरळमध्ये 1,252 उमेदवारांचे प्रतिनिधित्व करणारे 2,117 अर्ज, तर पुद्दुचेरीमध्ये 442 उमेदवारांचे प्रतिनिधित्व करणारे 514 अर्ज नोंदवले गेले. एकूण 2,511 उमेदवारांचे प्रतिनिधित्व करणारे 4,019 अर्ज दाखल झाले. तथापि, छाननी आणि अर्ज मागे घेतल्यानंतर, उमेदवारांची अंतिम संख्या 1,900 पेक्षा जास्त झाली आहे. मतदान होणाऱ्या राज्यांमध्ये लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 च्या कलम 126 अंतर्गत ‘शांतता कालावधी’ लागू आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​